वाहनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेत अधिक वाढ होणार – पालकमंत्री सुभाष देसाई
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : ग्रामीण पोलिस दलामध्ये जिल्हा नियोजन व विकास निधीतून सहा स्कार्पिओ, 87 मोटारसायकल आणि सात बोलेरोंचा समावेश झाला आहे. या वाहनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमता, गतिमानतेत अधिक वाढ होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ स्टेडिअमवर पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीनाताई शेळके, खासदार डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, आमदार रमेश बोरनारे, पोलिस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती.
पोलिस दलातर्फे डायल 112 प्रकल्पातील वाहने, महिला बीट मार्शल, आरसीपी प्लॅटून यांच्या पथसंचलनास पालकमंत्री देसाई यांनी हिरवी झेंडी दाखवून वाहनांचे लोकार्पण केले. यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासाला प्राधान्य देण्यात येते. यातून विविध योजनांना मंजुरी देण्यात येते. यापूर्वी शहर पोलिसांसाठी देखील वाहने उपलब्ध करून देण्यात आली.