वऱ्हाडीसह नवरदेवावर तीन किलोमीटर चिखल तुडविण्याची वेळ
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : घरात लग्न असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण, मात्र अचानक मध्यरात्रीपासुन पाऊस सुरू होऊन गाव अन् मुख्य रस्त्याचा संपर्क तुटून नवर देवासह वऱ्हाडी मंडळीवर तीन किलोमिटर रानावनाने चिखलातून वाट काढत मुख्य रस्ता गाठावा लागल्याची नामुष्की ओढवल्याचे चित्र दावरवाडी तांडा (ता.पैठण) येथे मंगळवारी पाहावयास मिळाले.
दावरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत तांडागाव मुख्य गाव व सोनवाडीपासून तीन किलोमिटर अंतरावर पस्तीस उंबऱ्याची वस्ती आहे. तीन आठवड्यापासून पावसाने उघड दिल्याने लग्नाचा बार उडवून द्यावा म्हणुन शेषराव राठोड यांनी त्यांचा मुलगा अमोल याचा विवाह मंगळवारी सुखापूरी (ता.अंबड ) येथे करण्याचे ठरविले. यासाठी सर्व नातेवाईक – मित्र आप्तेष्टांना बोलविण्यात आले.
वऱ्हाड नेण्यासाठी वाहन लावण्यात आले, अन् रात्रीला अचानक धो… धो… पाऊस आला व तांडा व मुख्य रस्त्याचा संपर्क तुटला. वाहन गावापर्यंत येत नसल्याने तीन किलोमिटरपर्यंत नवरदेवासह वऱ्हाडींना रानावनाने कमी अंतर कापण्यासाठी पिकांतून रस्ता काढत गुडघाभर चिखल… पाणी तुडवत सोनवाडीजवळ थांबलेल्या मुख्य रस्त्यापर्यंत दमछाक सहन करीत जावे लागले. यांत नटलेले नवरदेव, वऱ्हाडी चिखलमातीत भरून बेनूर झाल्याने दिवसभर हा विषय चर्चेचा बनला.