राज्य सरकारची मराठवाडा वॉटर ग्रीड योजना करण्याची इच्छा नाही; बबनराव लोणीकर
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : मुंबईत काल मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत ठोस असा निर्णय झाला नाही. उलट केंद्र शासनाकडेच ११ हजार ५८२ कोटींची मागणी महाविकास आघाडी सरकारने केली. राज्य सरकारला मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना करण्याची इच्छा नाही. असे मत भाजपाचे माजीमंत्री आ. बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
या योजनेसाठी हायकोर्टात जाण्याची तयारी केली असून वेळप्रसंगी अधिवशेनात देखील सरकारला जाब विचारण्यात येईल, असेही लोणीकर यांनी स्पष्ट केले.
आजवर तीन अधिवेशन झाले, परंतू या योजनेबाबत सरकारने काहीही निर्णय घेतला नाही. पश्चिम महाराष्ट्राने कायम मराठवाड्याला सापत्न वागणूक दिली आहे, त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा या योजनेला विरोध असल्याचा आरोप त्यांनी केला. योजनेला खीळ बसणे ही राष्ट्रवादीचे पाप असल्याचा आरोप ही लोणीकर यांनी यावेळी केला.