गैर आदिवासींनी बळकावलेल्या अनुसूचित जमातीच्या जागा तात्काळ भरा. – राज्यमंत्री डाँ. विश्वजीत कदम यांना बिकेडीचे निवेदन
पुणे – प्रतिनीधी दिलीप आंबवणे
गैर आदिवासींनी बळकावलेल्या अनुसूचित जमातीच्या राखीव जागा रिक्त करून त्या तात्काळ भरण्यात याव्यात.याकरिता पुन्हा कालबद्ध कार्यक्रम आखावा. अशी मागणी सामाजिक न्याय विभाग, सहकार विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे बिरसा क्रांती दलाच्या वतीने निवेदन देवून करण्यात आली आहे .
निवेदनात म्हटले की,राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय सेवा मंडळ, महानगरपालिका, नगरपरिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, महामंडळे, शासकीय अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, सर्व विद्यापीठे, सहकारी संस्था, शासकीय उपक्रम व शासनाने अनुदान दिलेली मंडळी येथील जागा आतापर्यंत रिक्त होणे अपेक्षित होते पण अजूनही शासनाच्या अनेक विभागांतर्गत गैर आदिवासींनी बळकावलेल्या अनुसूचित जमातीच्या जागा रिक्त करण्यात आलेल्या नाहीत.
२१ डिसेंबरच्या शासन निर्णयात नमूद असलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार विशेष भरती मोहीम राबविण्यात आलेली नाही आता मात्र या जागा लवकरात लवकर रिक्त करून सर्व जागांवर विशेष भरती मोहीम राबवण्यासाठी पुन्हा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा.
तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरविण्याच्या जात पडताळणी समितीच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयाने स्थगिती दिली असेल तर अशा प्रकरणी शीघ्रगतीने सर्वोच्च न्यायालयाचा ६ जुलै २०१७ चा निर्णय संबंधित उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून अशी प्रकरणे तात्काळ निकाली काढणे अपेक्षित असतांना कोणत्याही विभागप्रमुखांनी काळजी घेऊन कारवाई केलेली नाही पण आता तरी ती घेण्यात यावी व जागा रिक्त करण्यात याव्यात. अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी केली.