Kolhapur

सकाळीच होणार संध्याकाळ…-प्रा डॉ अविराज जत्राटकर

सकाळीच होणार संध्याकाळ…-प्रा डॉ अविराज जत्राटकर


कोल्हापूर प्रतिनिधी-सुभाष भोसले


गुरुवारी सकाळी ८.०४ते १०.५९ या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची अतिशय दुर्मीळ संधी मिळणार आहे. मूलतः कंकणाकृती असणारे हे ग्रहण आपल्या येथे मात्र खंडग्रास प्रकारचे असणार आहे.

ग्रहणाची सुरुवात सकाळी ८.०४ मिनिटांनी होईल. चंद्राची सावली वरच्या बाजूने सूर्यावरती पडण्यास सुरुवात होईल आणि हळूहळू ही सावली खाली खाली सरकताना दिसेल. जसा जसा सूर्य झाकला जाईल तसा तसा अंधार जाणवू लागेल. सकाळी ठीक ९.२३वाजता जास्तीत जास्त म्हणजे तब्बल ८३.५७% सूर्यबिंब झाकले जाईल आणि संध्याकाळ झाल्यासाररखी स्थिती निर्माण होईल. यावेळी निसर्गामध्ये झालेल्या या अनपेक्षित घटनेने पक्षी आणि प्राणी बावरले जातील. पक्ष्यांचा घरट्याकडे प्रवास सुरू होइल. जास्तीत जास्त किलबिलाट ऐकू येईल. कुत्र्यांचे ओरडणे देखील स्वाभाविक आहे. सावली खाली सरकत असताना थोडी उजवी कडे सरकेल आणि १०.५९ वाजता ग्रहण संपेल. ९.२३ नंतर थोडा थोडा प्रकाश वाढण्यास सुरुवात होईल व १०.५९ नंतर दिवस पूर्ववत होईल.

कोल्हापूर मधून हे ग्रहण कसे दिसेल हे शेजारच्या चित्रात दाखवले आहे. ज्यांना कंकणाकृती ग्रहण पहायचे असेल ते केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक च्या काही भागातून पाहू शकतात. मंगलोर, कोईम्बत्तूर, इरोडे, तिरुचिरापल्ली अशी काही त्यातली ठिकाणे.
यानंतर १०जानेवारी रोजी खंडग्रास चंद्रग्रहण तर २१ जून २०२१ रोजी खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळेल.

ठिकाण- कोल्हापूर जिल्हा
ग्रहण – कंकणाकृती सूर्यग्रहण
प्रारंभ – सकाळी ८.०४ वाजता
मध्य – सकाळी ९.२३ वाजता
समाप्ती- १०.५९वाजता
एकूण ग्रहण कालावधी – २तास ५६मिनिटे

ग्रहणामगाचे विज्ञान खूपच सोपे आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना जेंव्हा सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेंव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ज्या भागावर ही सावली पडलेली असते तिथून सूर्य दिसू शकत नाही किंवा झाकल्या सारखा दिसतो आणि त्यालाच आपण ग्रहण म्हणतो. अशी अवस्था दर अमावस्येला असते मात्र दर अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरतो त्यामुळे तो कधी जवळ तर कधी लांब असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्राचे प्रतल पृथ्वीच्या प्रतलाशी समांतर नसून ५ अंशाचा कोन करते. चंद्राची पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण होईपर्यंत दोनच वेळा तो पृथ्वीच्या प्रतलाशी समांतर असतो आणि नेमका अमावस्येच्या किंवा पोर्णिमेच्या वेळी तो त्या दोनपैकी एका ठिकाणी असेल तरच ग्रहण होते. त्यामुळे अशी स्थिती फार कमी वेळा जुळून येते. जर चंद्र पृथ्वीचे प्रतल समांतर असते तर प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण तर प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण असते, मात्र तसे नाही.

ग्रहण हा फक्त सावल्यांचा खेळ आहे. पृथ्वीची असो व चंद्राची, प्रत्येकाची सावली नेहमी आकाशामध्ये कुठे न कुठे पडलेली असते. जेंव्हा ती पृथ्वीवर पडते तेंव्हा आपण त्याला ग्रहण म्हणतो इतकाच काय तो फरक. इतर दिवशी जी हानिकारक किरणे सूर्यापासून निघतात तीच ग्रहणाच्या वेळी देखील निघत असतात. तेंव्हा घाबरून जाण्याची काहीच आवश्यकता नाही. ग्रहण ही एक शुद्ध अवकाशीय घटना आहे आणि सर्वांनी त्याचा मनमुरादपणे आनंद घेतला पाहिजे. फक्त काळजी इतकीच घ्यायची की उघड्या डोळ्यांनी हे ग्रहण न पाहता सौर चष्म्यातून किंवा फिल्टर मधून पाहिले पाहिजे. एका प्लास्टीक बॉल ला आरशाचा चोकोणी तुकडा चिकटवून त्याचे परावर्तन भिंतीवर पाडुन आपण ग्रहण पाहू शकतो. एखाद्या कागदी पुट्याला छोटस गोल छिद्र पाडून डोक्याच्या उंचीवर धरले असता छिद्रातून जमिनीवर पडणारा प्रकाश सूर्यग्रहण दाखवेल. घराच्या कौलातून किंवा पत्र्याच्या छिद्रातून जमिनीवर प्रकाशाचा जो कवडसा पडतो तो देखील सूर्यग्रहण दाखवेल. अश्या अनेक प्रकारे आपण सुरक्षितपणे सूर्यग्रहणाचा आनंद घेऊ शकतो.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button