केंद्र सरकार आणि राज्य सरकारने गरीबांचाही विचार करावा : खासदार इम्तियाज जलील
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : रिक्षावाल्यांसाठी १५०० रुपयांची मदत जाहीर केली. पण ती आतापर्यंत किती लोकांना मिळाली याची माहिती सरकारनेच द्यायला हवी, असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे. आज ते माध्यमांशी बोलत होते. खासदार जलील म्हणाले की, पूर्ण लाॅकडाऊन आहे. लोक रस्त्यावर नाहीत. रिक्षा जरी बाहेर निघत असल्या तरी त्यांना प्रवाशी मिळत नाहीत. दिवसभर बसल्यानंतर दोन-तीन प्रवाशी मिळतात.
त्याने पोट भरतील का ? कर्जाचे हप्ते कसे देतील? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे, की टिव्हीवर येताना गरिबांचाही विचार करावा. तरुण आत्महत्या करित आहेत. त्याला कोणी तरी जबाबदार असणारच. सरळी ही जबाबदारी सरकारवर जाते, असा हल्लाबोल त्यांनी केला.
आम्ही सरकारला विनंती करतो की साबळेंसारख्या आत्महत्याच्या घटना शहरात आणि राज्यात होऊ नये. याची काळजी सरकारने घेऊन लवकरात-लवकर कोणत्या प्रकारची मदत दिली जाऊ शकते, याचा विचार करावा. वित्तीय संस्था आणि बँकांच्या रिकव्हरी एजंट्सकडून दमदाटी करुन कर्जदार आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास देऊन वसूली केली जात आहे. हे सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी वित्तीय संस्था व बँकांना दिला.