? कव्हर स्टोरी-तांदूळ तर मिळाला पण खिचडीसाठी तेलचं नव्हतं.
सामाजिक अलगाव आमच्यासाठी अशक्य- गांधलीपुरा,शांतीनगर,मांग वाडा,कोष्टीवाडा इ
क्रमशः
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर
संपूर्ण देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन आणि सामाजिक अलगिकरण सुरू आहे… अनेक अश्या वस्त्या,पाडे, वसाहती आहेत की जेथे लॉकडाऊन मुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे.एकाच घरात पती, पत्नी आणि तीन मुली एक मुलगा यांच्यासह एकत्र कुटुंबात एकट्या कमाई करणारा सदस्य पुनमचंद पारधी आणि त्यासारखेच अनेक कुटुंबे…रोजंदारी करायची रोज कमवायच आणि रोज खायचं अशी परिस्थिती..त्याला हे माहीतच नव्हतं की या लॉकआऊटमध्ये टिकून राहण्यासाठी पुरेसा राशन साठऊन ठेवायला हवे होते.
सर्वात वाईट म्हणजे, पूनमचंद कडे रेशनकार्ड नाही. त्याने कधी भविष्याचा विचार केला नाही.थोडे फार पैसे होते म्हणून मी ते पैसे खाण्यावर खर्च करत आहे अशी त्यांची आशा आहे. परंतु कुलूप उघडल्यास मला फार त्रास होईल.
पुनमचंद आणि त्याच्या कुटुंबाला सामाजिक भेद करण्याचे महत्त्व समजते, परंतु एकमेकांना लागून असलेली अनेक घरे आणि सामान्य,सामूहिक शौचालय असल्यामुळे हा निष्फळ प्रयत्न आहे.
रोज एकत्र गर्दी होतेच.छोट्या छोट्या गल्ल्या..प्रत्येक घरात किमान सात आठ सदस्य..रस्त्यांवर,गल्लीत प्रचंड घाण,अस्वच्छता, डास, दुर्गंधी,वावरणारी डुकरे,(ज्यांची संख्या माणसांपेक्षा अधिक),सर्व सोई सुविधांपासून वंचित अश्या ह्या वस्त्या….घरा घरात अंतर एक फुटाचे तर माणसा माणसात किती अंतर ठेवावे हा मूलभूत प्रश्न…
सामाजिक कार्यकर्ते, संस्था, राजकीय पुढारी येतात थोडे फार अर्धवट धान्य ,तांदूळ आहे तर मीठ नाही अश्या वस्तू देतात, फोटो काढतात सोशल मीडियावर महानता, माणुसकीचे चित्र दाखवितात…पण हे पुरेसं आहे का? जो तो आपआपली पोळी भाजून घेताना दिसतोय…कोरोना विषाणू,लागण,संरक्षण,उपाय योजना, काळजी या पासून वंचित असलेले हे सर्व घटक सर्वच बाबतीत वंचित आहेत… ते म्हणतात आमच्यासाठी हे शक्य नाही…आम्हाला दोन वेळ च्या उदरनिर्वाहाची पडली आहे. आमची मुले रोजगार बंद असल्याने उपाशी आहेत.. ठराविक भागातच प्रशासन आणि लोक प्रतिनिधी पोहचतात आमचा विचार कोणी करत नाही…
सरकारने तीन महिन्याचे रेशन देण्याचे आदेश दिले पण पूर्ण अन्न धान्य पाठविले नाही.फक्त तांदूळ आणि गहू मिळत आहे.यातून कसा उदरनिर्वाह होणार? लोकांनी दिवे पेटविण्यात तेल घालविले पण आम्हाला खिचडी रांधण्यासाठी तेलच नव्हते नुसता भात मुलांना खाऊ घालावा लागतो..मुलंही वैतागले आहेत…अलगाव आमच्यासाठी अशक्य आहे.
अनेक समस्या या सर्व गरीब वस्तीत राहणाऱ्या भरताच्याच नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्रात राहणाऱ्या लाखो कुटुंबाच्या आहेत.त्यांची अवस्था, मजबुरी,लाचारी पाहून मनात शेकडो प्रश्न निर्माण होतात.काय करता येईल की जेणे करून या सर्व समस्यांवर उपाय योजना करता येईल? मनात प्रश्नाचं काहूर घेऊनच मी या वाड्या वस्त्यांमध्ये फिरून डोक्यात अनेक विचार घेऊनच परतली..माझ्या कडे आशेने पाहणाऱ्या नजरा..आम्हाला न्याय मिळेल या भावना..मी मात्र खाली हात आणि प्रचंड वादळ आणि डोळ्यात अश्रू घेऊनच परतली…खुप काही करायची इच्छा ..पण मी पण माझा खारीचा वाटा उचलत आहे आणि उचलत राहणार आहे..
निराश झालेल्या मनांवर मायेची फुंकर घालणार आहे…मला जेवढं शक्य होईल तेवढी साथ मी माझ्या गावातील ह्या वंचित कुटुंबाना देणार आहे..