बारामती उपविभागात पावसाचा सोळा हजार एकरला फटका
प्रतिनिधी – आनंद काळे
बारामती – बारामती,इंदापूर व दौड तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर उठला.अनेक गावांमध्ये झालेली अतिवृष्टी पिंकाचे नुकसान करणारी ठरली.नुकत्याच झालेल्या पाहणीतून बारामती,इंदापूर व दौड तालुक्यात पावसाचा 16 हजार एकरला मोठा फटका बसला.
अतिवृष्टी व वादळी वाऱ्याने या तीन तालुक्यातील अनेक गावामधील पिके जमीनदोस्त झाल्याने उत्पादनात घट येणार आहे.मात्र कोरोनाच्या काळात मेहनत घेऊन उभी असलेली पिके काही क्षणात भुईसपाट झाली.
अति पावसामुळे अनेक भागाचे नुकसान झालेले आहे.मात्र सुरुवातीला प्रशासनाचे पंचनामे करण्याची मानसिकता नव्हती. बाजरी,ऊस,मका,सोयाबीन,भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली.त्याची दखल घेत प्रशासनाने तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले.याचे पंचनामे अजून सुरूच आहेत.
मात्र आत्तापर्यंत झालेल्या पंचनाम्याच्या आकडेवारीनुसार 6 हजार 548 हेक्टर क्षेत्रावरील पिंकाचे मोठे नुकसान झाल्याचा निष्कर्ष निघाला आहे.अजूनही इंदापूर व दौड तालुक्यातील पंचनामे सुरू असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी दिली.