डीबीटीची रक्कम आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा.
ट्रायबल फोरमची मागणी.
यवतमाळ – शैक्षणिक सत्र २०२०-२१ ची डीबीटी रक्कम आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्याची मागणी ट्रायबल फोरमने केली आहे.
या संदर्भात आदिवासी विकास मंत्रीअँड.ना.के.सी.पाडवी,
आदिवासी विकास विभाग नाशिकचे आयुक्त यांना ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड.प्रमोद घोडाम यांनी निवेदन पाठविले आहे. राज्यात आदिवासी विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ वितरण करण्यासाठी शासनाने ११ कोटी ९९ लाख ९७ हजार रुपये योजनेच्या बँक खात्यात वर्ग केले.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ संपून गेले. दुसरेही २१-२२ शैक्षणिक वर्ष संपत आले तरीही आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात पूर्णतः रक्कम जमा करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब ट्रायबल फोरमने उजेडात आणली आहे.
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा अंतर्गत शैक्षणिक सत्र २०-२१ मध्ये ९९६ विद्यार्थी प्रवेशित होते.शैक्षणिक वर्ष संपुन गेले तरी या विद्यार्थ्यांच्या खात्यात पूर्णतः रक्कम जमा झालेली नाही. काहींच्या खात्यात १२ हजार ९०० रुपये,काहींच्या खात्यात १६ हजार रुपये ,काहींच्या खात्यात २२ हजार रुपये तर काहींच्या खात्यात काहीच रक्कम जमा करण्यात आलेली नाही.
अनुसूचित जमातीच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतरच्या उच्च शिक्षणाकरीता भोजन,निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्याबाबत राज्यात सन २०१६-१७ पासून पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत मुंबई शहर,मुंबई उपनगर,नवी मुंबई,पुणे, ठाणे,पिंपरी चिंचवड ,नागपूर याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम ६० हजार रुपये आहेत. महसुली विभागीय मुख्यालय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपये अनुज्ञेय आहे.तर जिल्ह्याचे ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ४३ हजार रुपये अनुज्ञेय आहे.परंतू शैक्षणिक सत्र २०२०-२१ मधील डीबीटी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या ९९६ विद्यार्थ्यांच्या खात्यात अद्यापही पूर्णतः जमा करण्यात आलेली नाही.