Amalner

ग्रामपंचायत मध्ये घरपट्टी व पाणीपट्टी इतर कर का भरायचा असतो.

ग्रामपंचायत मध्ये घरपट्टी व पाणीपट्टी इतर कर का भरायचा असतो.

विनोद जाधव अमळनेर

अमळनेर : ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आणि घरपट्टी, पाणीपट्टी, व इतर कर हे ग्रामपंचायतचे उत्पनाचे प्रमुख साधन आहे. ग्रामपंचायतीस शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी जरी मिळत असला तरी तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो.
गावाला दैनंदिन पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती व देखभाल करणे, ब्लिचिंग पावडर खरेदी, वीजबिल भरणे, कर्मचारी पगार करणे, गावातील स्वच्छता, किरकोळ रस्ते दुरुस्ती, गटार दुरुस्ती, रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय करणे, कार्यालयीन खर्च यासारखी अनेक नित्याची कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. ही कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणे आवश्यक असते. घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमा होणाऱ्या निधीतून वरील व इतर आवश्यक कामे ग्रामपंचतीस करणे शक्य होते. त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारक यांनी आपला घरपट्टी, पाणीपट्टी कर,व इतर करांचा भरणा त्या त्या आर्थिक वर्षात करणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायत ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे असते, जसे ज्या कुटुंबात पैसा येईल ते कुटुंब त्याच्या आवश्यक गरजा भागवू शकते, तसेच जर ग्रामपंचायतला घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करातून जर पैसा जमा झाला तरच ग्रामपंचायत गावातील अत्यावश्यक कामे व गरजा पूर्ण करू शकते.
गावात ज्यावेळी एखादा नागरिक ग्रामपंचायतला कुठल्या कामानिमित्त किंवा प्रमाणपत्र मागणीसाठी जातो, त्यावेळी त्याला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच घरपट्टी, पाणीपट्टी, इत्यादी करांचा भरणा करावयास सांगतात, त्यावेळी त्या नागरिकाची अशी भावना होते की, ग्रामसेवक किंवा सरपंच मला मुद्दामहून अडथळा आणत आहे, वास्तविक पाहता, जर अशा नागरिकाने आधीच ग्रामपंचायतीचा कर भरलेला असेल तर त्या त्या वर्षात वर्षभर त्याला ग्रामपंचायत सुद्धा कराची मागणी करणार नाही आणि फक्त प्रमाणपत्राची फीस भरून त्याला नियोजित वेळेत प्रमाणपत्र ही उपलब्ध होऊ शकेल. आणि नागरिकांचा गैरसमज सुद्धा होणार नाही, की ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच हे त्यांची अडवणूक करत आहेत म्हणून.
कर जर नाहीच भरला तर?
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्रामपंचायत कर व फी नियम (सुधारणा) २०१५यामधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीचा कर हा प्रत्येक मालमत्ता धारकाला भरावाच लागतो, तो कधीही माफ होत नाही. तसेच थकबाकी रकमेवर दरवर्षी ५% व्याजसुद्धा भरावे लागते. तसेच ग्रामपंचायत कराच्या रकमेच्या वसुलीसाठी अशी मालमत्तेची जप्तीसुद्धा करू शकते. आणि अशा कार्यवाहीचा खर्चही वसूल केला जातो.
कर न भरल्यामुळे एक तर आपली कराची रक्कम वाढत जाते, त्यावरील अतिरिक्त दंडही भरावा लागतो, आणि जप्तीसुद्धा होऊ शकते, आणि एव्हढे होऊनही शेवटी कराची रक्कम भरावीच लागते.
त्यापेक्षा जर आपण आपला कर दरवर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यात भरला तर आपल्याला घरपट्टीच्या चालू रकमेवर ५% सूट सुद्धा मिळते. मार्चपर्यंत भरला तर दंडही लागत नाही आणि आपण ग्रामपंचायतला कधीही कुठल्याही कामासाठी गेलो तरी कुणी आपल्याला कर भरा म्हणून तगादाही लावणार नाही.
ज्या गावात ग्रामपंचायतच्या करांचा भरणा लोक स्वइच्छेने करतात, ते गाव नक्कीच प्रगतीपथाकडे अग्रेसर असते, हे सांगण्यासाठी कुणाही ज्योतिषाची गरज नाही. कराच्या रूपाने ग्रामस्थ ग्रामपंचायतीला आर्थिकदृष्ट्या बळकट करत असतात आणि त्यातूनच एका सक्षम गावाची निर्मिती होत असते.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या करांचा भरणा करून आपली ग्रामपंचायत आणि गाव अधिक सक्षम करुया

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button