रत्नाकर मखरे गोरगरीबांचे अश्रू पुसणारे समाजसेवक होते : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
दत्ता पारेकर पुणे
पुणे : इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मल्हारी मखरे यांचे (दि.१४) दुःखद निधन झाले.त्यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम संस्थेच्या भिमाई आश्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.
तात्यांचे थोरले सुपुत्र ॲड. राहूल मखरे यांनी तथागत भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वडील कालकथित रत्नाकर मखरे तात्या यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तदनंतर बौध्दाचार्य मा.बाळासाहेब धावारे ( राज्य उपाध्यक्ष, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क महाराष्ट्र) यांनी बौध्द धर्मानुसार विधिवत पूजा केली, उपस्थितांनी दोन मिनिट स्तब्ध उभे राहून तात्यांना श्रध्दांजली वाहिली.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रत्नाकर मखरे तात्यांच्या प्रती भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
यावेळी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, रत्नाकर मखरे उर्फ तात्या यांच्या जाण्याने इंदापूर तालुका पुरोगामी विचारला मुकला असून ,आंबेडकरवादी चळवळीची फार मोठी हानी झाली आहे. तात्या हे गोरगरिबांचे अश्रू पुसणारे समाजसेवक होते.तात्यांच्या सामाजिक कार्याचा वसा ॲड. राहूल मखरे व कुटुंबीयांनी पुढे सुरू ठेवावा हीच खरी तात्यांना श्रद्धांजली ठरेल. मी तुमचा थोरला भाऊ म्हणून भविष्यकाळात तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील.अशा शब्दात श्रद्धांजलीपर भाषणात आपल्या भावना व्यक्त करत हर्षवर्धन पाटील यांनी तात्यांना श्रद्धांजली वाहिली.
राज्याचे राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे म्हणाले की, रत्नाकर मखरे तात्या शोषित, वंचित, पिडीत वर्गाचे आधारवड होते, तात्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध होते. संस्थेच्या कार्यकारी मंडळावर माझी विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती केली.याचा मला विशेष आनंद झाला होता. समाजहिताची कामे करणाऱ्या आणि खऱ्या माणसाची पारख खऱ्या अर्थाने तात्यांना होती.तात्या स्वतःच्या कुटुंबाइतकेच प्रेम आपल्या संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मुलांवर व संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करत होते. त्यांच्या जाण्याने सर्वसामान्य जनतेची वकिली करणारा पालक हरपल्याची भावना जनमानसात आहे. तात्या स्वतः पेक्षा इतरांची जास्त काळजी घेत असतं.यापुढे ॲड. राहूल मखरेंचा मोठा भाऊ म्हणून आपल्या सोबत असून साथ देईल असे यावेळी आश्वस्त केले. माझ्या चांगल्या कामाची प्रशंसा करणारा ,माझ्या सुख दुःखाच्या व अडीअडचणीच्या प्रसंगी साथ देणारा आधार आणि मार्गदर्शक हरपल्याची भावना श्रद्धांजलीपर भाषणात राज्यमंत्री भरणे यांनी व्यक्त केली.
तदनंतर पोपट पवार,कैलास चव्हाण (बारामती), कैलास कदम, शिवाजीराव मखरे, संदीपान कडवळे,प्रा. अशोक मखरे, ॲड. समीर टिळेकर, ॲड. बापूराव साबळे,मोरे, अरविंद वाघ आदींनी रत्नाकर मखरे यांना श्रद्धांजली वाहिली.
प्रा. डी. आर. ओहोळ सर ( राष्ट्रीय महासचिव, बामसेफ नवी दिल्ली)यांनी रत्नाकर मखरे यांनी केलेल्या सामाजिक, राजकीय कार्याचा लेखाजोखा आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला. यावेळी “पंढरीचा पांडुरंग कोण” ? प्रा.विलास खरात लिखित पुस्तकाचे कार्यक्रम स्थळी वाटप करण्यात आले. तसेच आठवणीतील रत्नाकर मखरे तात्या/ लढव्या तात्या ह्या पुस्तकाचे प्रकाशन तात्यांच्या स्मृतिदिनी करण्यात येईल.असे यावेळी जाहीर करण्यात आले.
पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच संस्थेचे पदाधिकरी व संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.