ब्राम्हणशेवगे येथील नानांच्या स्मरणार्थ स्मशानभुमित वृक्षारोपण : विसर्जित न करता दिली वड झाडांना अस्थी राख पर्यावरण रक्षणासाठी प्रेरणादायी उपक्रम..
ब्राम्हणशेवगे : ता.चाळीसगाव येथील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील अग्रणी व आदर्श शेतकरी कै.उध्दवराव रावजी बाविस्कर उर्फ नाना यांचे दि.२८ सप्टेबर २०१९ रोजी कॅन्सर या दुर्धर आजाराने वयाच्या ६७ व्या वर्षी दुःखद निधन झाले.तिसर्या दिवशी सारीचा कार्यक्रम होता.
मृत्युनंतर राख आणि अस्थी पवित्र नदीत विसर्जित करण्याची प्रथा आहे.धार्मिक ग्रथाप्रमाणे पाण्याला, नदीला देव मानले जाते.असे मानले जाते की मृत्यूनंतर जेवढी वर्षे ही अस्थी राख पाण्यात, नदीत राहतात तेवढ्या वर्षांपर्यंत ती व्यक्ती स्वर्ग लोकांत पुजली जाते.
तसेच अस्थी राख नद्यांमध्ये विसर्जित करण्याचे वैज्ञानिक कारणही सांगितले जाते की, नद्यांमध्ये पारा आढळतो.ज्याने हाडांमध्ये आढळणारे कॅल्शियम आणि फॉस्फरस विरघळून जातात.हे पाण्यात राहणाऱ्या जिव जंतूसाठी पौष्टिक आहाराचे काम करते.हाडांमध्ये असलेले सल्फर पार्यामध्ये मिसळून पाण्याला स्वच्छ ठेवण्याचे काम करत.
परंतु रत्नाकर व पद्माकर या दोन्ही बंधुनी आपल्या वडिलांच्या सामाजिक कामाच्या प्रेरणेने पावलावर पाऊल ठेवत पर्यावरण रक्षणाचा विचार करत व आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ राख नदीत विसर्जित न करता स्मशानभुमित वटवृक्षाचे झाड लाऊन त्या झाडांच्या मुळांना राख देऊन एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
नाना हे आपल्याच कुटुंबाचे आधारस्तंभ नव्हते तर शेकडो कुटुंबाचे ते आधारस्तंभ होते.त्यामुळे त्यांच्या आठवणी शेकडो वर्षांपर्यंत वटवृक्षाप्रमाणे रहाव्यात यासाठी ही संकल्पना आल्याने तसेच ईतरांनीही निसर्ग संवर्धन, पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत व प्रेरणा घेतली पाहिजे हा यामागचा हेतू असल्याचे बाविस्कर कुटुंबाने याप्रसंगी नमुद केले.