पीएम मोदींना ‘ते’ वक्तव्य भोवणार? रेणुका चौधरी दाखल करणार अब्रुनुकसानीचा दावा
दिल्ली प्रतिनिधी । सुशिल कुवर
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चार वर्षे जुन्या वक्तव्यावर दोषी ठरवून त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री रेणुका चौधरी याही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्याच्या तयारीत आहेत. जवळपास पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या टिप्पणीवरून रेणुका चौधरी हे पाऊल उचलणार आहेत.
आपण दावा केल्यानंतर न्यायालयात किती वेगानं हालचाली होतात, तेही पाहणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. सूरत न्यायालयानं राहुल गांधींना अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिक्षा सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर चौधरींनी संताप व्यक्त केला आहे. रेणुका चौधरी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
This classless megalonaniac referred to me as Surpanakha on the floor of the house.
I will file a defamation case against him. Let's see how fast courts will act now.. pic.twitter.com/6T0hLdS4YW
— Renuka Chowdhury (@RenukaCCongress) March 23, 2023
२०१८ मध्ये संसदेत राज्यसभेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेणुका चौधरी यांना शूर्पणखा म्हटलं होतं. त्याचा उल्लेख करत चौधरी यांनी एक छोटी व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे.
राज्यसभेत नेमकं काय घडलं होत?
७ फेब्रुवारी २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत संबोधित करत होते. त्यावेळी रेणुका चौधरी एका गोष्टीवर मोठ्याने हसल्या होत्या. पंतप्रधानांनी तत्कालीन अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना संबोधून म्हटले की, अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला विनंती करतो की, रेणुका जींना काहीही बोलू नका. आज रामायण मालिकेनंतर असे हास्य ऐकण्याचे सौभाग्य मिळाले.
दरम्यान, रेणुका यांनी जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यावर कमेंट्स येऊ लागल्या आहेत. काही युजर्सचं म्हणणं आहे की, मोदी यांनी यात कुठेही ‘शूर्पणखा’ असं म्हटलेलं नाही. तसेच संसदेत एखादं वाक्य बोललं असेल तर त्यासाठी न्यायालयात जाता येत नाही, असा दावा काहींनी केला आहे.