दिलाचे Talk..बलात्कार..मैं लूट गयी बरबाद हो गयी..! सिनेमा आणि वस्तुस्थिती…
बलात्कार हा शब्दच मुळात इतका विचित्र आणि अंगावर शहारे वै आणणारा आहे.गेल्या अनेक दशकांपासून भारतीय चित्रपट सृष्टी त बलात्कार आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या घटना,संवाद आपण पाहत आहोत ऐकत आहोत.अत्यन्त भयानक असे चित्रण चित्रपटातुन दाखवून जास्तीत जास्त आर्थिक गल्ला कसा मिळवता येईल हाच दृष्टिकोन ह्या चित्रपटांचा दिसून येतो.
बलात्कार.. चित्रपट..आणि वस्तुस्थिती ही इतकी वेगवेगळी आणि भिन्न आहे की हे फिक्शन दाखवितांना आपण स्त्री च्या मनाची विचारांची,अस्तित्वाची वाट लावत आहोत हे दूर दूर पर्यंत लक्षात येत नसावे का?
ज्या महिलेवर,मुलीवर बलात्कार होतो तिचं च चुकलेले आहे..!शब्द रचनाच इतकी खतरनाक असते की तिच्याच आयुष्याचं नुकसान होत..जिंदगी बरबाद होते..!
.उसका सबकुछ लुट गया..! ‘वो बरबाद हो जाती है..! वो किसीके क़ाबिल नहीं रहती…! वै..
एक बलात्कार आणि सगळं आयुष्य च संपलं काय?
या देशात योनिशुचिता हे भयंकर मोठं फॅड आहे..! विशेष म्हणजे ही योनीसुचिता धर्म संस्कृती शी जोडली गेली आता पुरुषांना लिंग सुचिता का नसावी..? त्यांना ती नसतेच..! कारण सर्व नियम,संस्कृती,संस्कार ह्याची वाहक फक्त स्त्रीच आहे..!
स्त्री ची मानसिक सुरक्षितता..! तिचं काय..!कधीही ह्या गोष्टींचा विचार केला जात नाही. ती मानसिक रित्या सक्षम आहे का? तिच्या शरीरावर बलात्कार तर होतोच पण मनावर झालेल्या आघातांचं काय..!पुरुष शरीरावर जबरदस्तीने आघात करून मोकळा होतो..! पण तिच्या मनावर झालेला आघात हा खूप मोठा असतो..! विश्वास आणि सुरक्षितेतला गेलेला तडा असतो..!
पण बाकी शिक्षण, करियर,अंगातले गुण, कलाकौशल्य, आयुष्यातली मोलाची नाती, स्वप्नं, काम, इच्छाआकांक्षा, कर्तृत्व, जोडलेला वा जोडायचा पैसाअडका…. या सगळ्याचं काय? हे सगळं एका क्षणात शून्य झालं का?
हिंदी सिनेमात हे गृहीतच धरतात… ‘सबकुछ लुट गया’ म्हणत पुढे तिचं जीवन शून्य..! ‘जीने के लिये अब बचा क्या हैं उस के पास?’ असा किंवा याच धर्तीचा संवाद हमखास बलात्कारित स्त्री साठी चित्रपटातून आढळून येतो..
बलात्कार झाला..!बस तिचं आयुष्य संपलं..हे वैश्विक सत्यच आहे जणू.. बलात्कार झाला, आता मरणच..!
बाय द वे.. बलात्कार ‘होतो’.जसं चमत्कार होतो, सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो, वादळ होतं, तसा जणू आपोआप बलात्कार होतो…! त्यात कोणी कोणावर.? का..? झाला ..? ही इतर नैसर्गिक क्रियांसारखी गोष्ट नाही ..!ना..! बलात्कार केला जातो..! होतो नाही हो..!त्यात अमुक एका व्यक्तीची क्रिया समासिष्ठ असते..!
हिंदी चित्रपट सृष्टीने ह्या बलात्काराचा शब्दशः बाजार मांडला..क्रूर खलनायक आणि सुंदर नायिका..!तिचं शोषण..दाखविण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती आवश्यक..!तिचं ओरडणं..इतरांचं हसणं..!आणि प्रेक्षकांच्या शिट्या आणि टाळ्या..! बस इतकंच ..!त्यानंतर तिचं हतबल होणं..! मैं लूट गयी..!बरबाद हो गयी..! वै म्हणणं..आणि
बलात्कार झालेल्या स्त्रीला स्वतःबद्दल असते ती कलंक लागल्याची भावना.मग नायक जर मानत नसेल, तर तो महापुरुष वा देवच असला पाहिजे, अशी बलात्कारित पात्राची एक ठाम समजूत असते. ‘पतिता’सारख्या समांतर चित्रपट देखील ह्या पुरुष उदात्तीकरण च्या भावनेतून सुटला नाही.. चित्रपट नायिका बलात्कारित स्त्री आणि तिला नायकानं स्वीकारणं..!म्हणजे..बापरे जगातील अति उच्च अशी उत्कृष्ट गोष्ट करणे..! नायिका तर नायकाच्या पाया तर पडतेच शिवाय ‘तुम्हारी चरणों में मुझे जगह दे दो’ वै म्हणत त्याची आयुष्य भराची दासी व्हायला तयार असते..!विशेष म्हणजे ह्या बलात्कार घटनेत तिचा काहीच दोष नसतो..!तरीही तिचं दुय्यमी करणं आणि पुरुष प्रधान संस्कृती च उदात्तीकरण हेच ह्या चित्रपट सृष्टीने कायम पडद्यावर दाखविले आहे.
या सर्व प्रक्रियेत ‘अपनाना’, ‘स्वीकार करना’, ‘मेरे भगवान’… अशी शब्दयोजना अशा कथानकांमध्ये पुन्हा-पुन्हा येते. ‘पतिता’ हा खूप जुना चित्रपट त्यावेळची मानसिकता आणि समाज रचना ही वेगळी..!नावही त्यावेळी च्या समाज आणि संस्कृती ला साजेसं.. ‘दामिनी’सारख्या चित्रपतातही ह्याच चुका वारंवार झालेल्या दिसून येतात. बलात्कारित स्त्री च्या छटा दाखविण्यासाठी विविध प्रकाश योजनांचा उपयोग केला जातो. विशेष म्हणजे तिच्या मनाचे कवडसे दाखविण्यात ही प्रकाश योजना अपयशी ठरतात..! अगदी श्याम बेनेगल यांच्या ‘निशांत’चाही याला अपवाद नाही. पतीच्या दृष्टीने सुशीला कलंकित आहे असंच सुशीलेला वाटतं..!
ह्या सर्व प्रक्रियेत बलात्कार झालेल्या स्त्री च मुलीचं समुपदेशन..तिचं मानसिक बळ वाढविण्याची क्रिया..प्रयत्न थोड्या फार प्रमाणात आता 22 शतकाच्या उत्तरार्धात जरी थोडे फार जाणवत असले तरी चित्रपट हे समाज प्रबोधनाचे मुख्य साधन बनू शकते.. त्यातून दाखविल्या जाणाऱ्या वरील प्रकारच्या घटना,संवाद यामुळे तरुण पिढी ला हेच बिंबवले जात आहे की बलात्कार करणं हे वाईट नाही.. हा स्त्रीचाच गुन्हा आहे..! आपलं काही बिघडत नाही..जे काही बिघडतं ते स्त्री चच यामुळे आणखी ह्या प्रवृत्तीना खत पाणी घालण्याचं काम चित्रपट करत असतात..!मुळात ह्या घटना दाखविल्याच पाहिजेत का..! प्रत्येक चित्रपटात स्त्री च शोषण झालंच पाहिजे का..?
मुळात ज्या स्त्री वर किंवा मुलीवर बलात्कार केला जातो तिच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेची कोणाला कल्पना तरी आहे का?तिचं जीवन तिनं का एका क्षुल्लक गोष्टी साठी बदलावं..? तिची चूक नसताना सर्व आरोप प्रत्यारोप तिच्या च वाट्याला का यावेत..? ह्या गोष्टी ला एव्हढं महत्व का दिलं जावं? तिचा आरोपी मोकळा फिरतो आणि ती मात्र खूप काही नष्ट झाल्याच्या भावनेनं घरातच बसते..! का..? अनेक वेळा बलात्कार होतो पण तक्रार दाखल केली जात नाही कारण तिची बदनामी..! हे सर्व बदलणे गरजेचे आहे.. चित्रपट दिग्दर्शक निर्माते हे उत्तम समाज सुधारकांची भूमिका पार पाडू शकतात..ह्या विषयावर स्त्रियांचं मनोबल वाढवून पुरुष मानसिकतेला आळा बसू शकतो..!