?शेतकरी लढा…. तर मीपण राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करणार, विजेंदर सिंगचाही शेतकरी आंदोलनाला पाठींबा…
नवी दिल्ली | कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. दिवसेंदिवस आंदोलन पेटतच चाललं आहे. अशातच बॉक्सर विजेंदर सिंगनेसुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देत केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि कृषी क्षेत्रातील हे काळे कायदे रद्द झाले नाहीत. तर मी मला देण्यात आलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करणार असल्याचं विजेंदर सिंगनं म्हटलं आहे.
विजेंदर सिंगच्या आधी पंजाब आणि हरियाणा राज्यातील पुरस्कार विजेत्या खेळाडूंनीसुद्धा आपला पुरस्कार परत केला आहे. यामध्ये पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू कर्तार सिंग, अर्जुन पुरस्कार विजेते बास्केटबॉलपटू साजन सिंग चीमा आणि अर्जुन पुरस्कार विजेते हॉकीपटू राजबीर कौर यांचा समावेश आहे.
दरम्यान, कालही शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये बैठक झाली होती. मात्र त्यामध्येही तोडगा निघाला नसून येत्या 9 डिसेंबरला पुन्हा बैठक होणार आहे.