? राजकारण तापलं ! ग्रामपंचायत निवडणुकीवरून रोहित पवार आणि राम शिंदेमध्ये जुंपली
अहमदनगर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कर्जत-जामखेड मतदार संघातही ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरू झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 30 लाखांचे बक्षीस जाहीर केलं आहे.
दुसरीकडे, भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या फॉर्मुल्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. राम शिंदे यांनी रोहित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार आणि माजी आमदार राम शिंदे हे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.
कर्जत-जामखेड मतदार संघात ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध केल्यास त्या ग्रामपंचायतमध्ये 30 लाखांचा भरीव निधी देण्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली होती.
यावर राम शिंदे म्हणाले, 30 लाखांचा भरीव निधी देऊ हे एक प्रकारचे प्रलोभन आहे. याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने चौकशी समिती नेमून चौकशी करून दोषी असल्यास संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे.
काय म्हणाले राम शिंदे?
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलेलं बक्षीस म्हणजे प्रलोभन आहे. निवडणुकीत प्रलोभने दाखवणे, जनतेवर दबाव तंत्राचा वापर करणे, पैशाच आमिष दाखवणे, हा प्रकार गैर आहे. एखाद्या आमदारांनं विकासावर बोलावं. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार रोहित पवार हे घटनाविरोधी बोलले. त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे. राज्यात अशा पद्धतीनं निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा पडली तर भविष्यात टाटा, बिर्ला आमदार-खासदार होतील, असा खोटक टोला देखील राम शिंदे यांनी लगावला. देश पुन्हा हुकूमशाहीकडे नेण्याचं चित्र सध्या दिसत असल्याची टीकाही राम शिंदे यांनी केली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या टीकेवर पलटवार केला आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर विकास कामासाठी 30 लाखांचा भरीव निधी देण्यात येईल, असं मी म्हणालो, यात काय गैर आहे, असं रोहित पवार यांनी यांनी सांगितलं. राम शिंदे यांना कदाचित गावात गटतट असावे, असा त्यांचा प्रामाणिक हेतू असावा. कोरोनाच्या काळात लोकांचा मोठ्या प्रमाणात झाला आहे. गावात गटतट असल्यामुळे विकास खुंटतो. राम शिंदे काय म्हणतात, त्यापेक्षा लोकांना काय वाटतं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.