श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शासनाला 51 कोटींचा निधी देण्याचा निर्णय
राहुल फुंदे
शिर्डी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने देश व राज्यावर आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय संस्थानच्या तदर्थ समितीने घेतला असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
श्री.डोंगरे म्हणाले, जगभरात व देशाभरात थैमान घालणा-या कोरोना व्हायरसच्या मुकाबल्यास तोंड देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सज्ज झाले आहे. याच पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय संस्थानच्या तदर्थ समितीने घेतला आहे.
संस्थानचे श्री साईप्रसादालयाच्या वतीने श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईक, शिर्डी परिसरातील अनाथ आश्रम, वृध्दाआश्रम, मुखबधीर विद्यालय, बंदोबस्तावरील पोलिस कर्मचा-यांना, शिर्डी बस स्थानकावरील निराधार व गरजुंना आणि संस्थानच्या व शासकीय कार्यालयातील सरंक्षण, स्वच्छता व इतर कार्यरत कर्मचा-यांना निशुल्क भोजन पुरविण्यात येत आहे.
खेडोपाडी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचा-यांना अल्पोहारासाठी आज पासून ३ हजार बुंदीची व ३ हजार चिवडयाची पाकीटे जिल्हा पोलिस मुख्यालयाला देण्यात येत आहेत.
संस्थानच्या वतीने यापुर्वी ही राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीत वेळोवेळी मदत केलेली आहे. यामध्ये केरळ मधील पुरामुळे आपदग्रस्त झालेल्या पुरग्रस्तांसाठी ५ कोटी, राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १२ कोटी तसेच पुलवामा येथील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीकरीता २.५१ कोटी रुपये निधी देण्यात आलेला असल्याचेही श्री.डोंगरे यांनी सांगितले.
याप्रसंगी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे हे उपस्थीत होते.
श्री साईबाबांच्या शिकवणुकीप्रमाणे बाबांनी त्यांचे ह्यात कधी कोणालाही उपाशी पोटी ठेवले नाही. बाबांनी स्वतः भिक्षा मागून गोरगरिबांना जेऊ घातले आहे. त्याच उद्देशाने श्री साईबाबा संस्थानचे वतीने श्री साई प्रसादालयामार्फत गरजू, गोर-गरीब लोकांसाठी जेवण पुरविणेचा निर्णय घेतला असून, दि.१८/०३/२०२० रोजीपासून प्रसादालय बंद झाल्यानंतर दररोज साधारणपणे १८०० ते २००० लोकांसाठी जेवण तयार करणेत येत असून, सदरचे जेवण संस्थानचे साईबाबा व साईनाथ ही दोन्ही हॉस्पिटल, शिर्डी परिसरातील वृद्धाश्रम, अनाथालय, मूक बधीर शाळा, अंध/अपंग शाळा त्याचप्रमाणे शिर्डी बस स्टँडवरील गोरगरीब लोकांना अन्नदान करणेत येत आहे._*