Shirdi

साईनगर शिर्डी येथून रेल्वेने 1519 कामगार व कुटुंबिय उत्तर प्रदेशकडे रवाना

साईनगर शिर्डी येथून रेल्वेने 1519 कामगार व कुटुंबिय उत्तर प्रदेशकडे रवाना

* रेल्वे प्रवासाप्रित्यर्थ 9 लाख 47 हजार 700 रुपये अदा केले शासनाने

* राहाता, संगमनेर व कोपरगांव तालुक्यातील कामगार

* वैद्यकीय तपासणी करुन प्रशासनाने पुरविल्या विविध सुविधा

* साईनगर शिर्डी येथून चौथी रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना

राहुल फुंदे

शिर्डी,दि.16: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राहाता, संगमनेर आणि कोपरगांव तालुक्यातील उत्तर प्रदेश राज्यातील 1519 कामगार व त्यांचे कुटुंबिय आज साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्हयाकडे रवाना झाले. यापैकी 1 हजार 404 प्रौढ कामगारांचे रेल्वे प्रवासाप्रित्यर्थ रुपये 675 प्रमाणे एकूण 9 लाख 47 हजार 700 एवढे भाडे महाराष्ट्र शासनातर्फे अदा करण्यात आले आहे. रोजगारानिमित्त हे सर्व जण उपरोक्त तीन तालुक्यातंत वास्तव्यास होते. या कामगारांना उत्तर प्रदेशातील उन्नाव, सीतापूर व बस्ती येथे पोहोचविण्यात येणार आहे. साईनगर शिर्डी येथून आज चौथी रेल्वे सोडण्यात आली असून तीन्ही तालुक्यातील परप्रांतीय कामगारांना उत्तर प्रदेशकडे नेणारी पहिलीच रेल्वे होती.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. राज्याच्या विविध भागात अन्य राज्यातून आलेले कामगार, नागरिक,पर्यटक,विद्यार्थी आणि भाविक विविध ठिकाणी अडकून पडले होते. या सर्वांना विहित प्रक्रिया राबवूव त्यांच्या गावी जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे शासनाने आदेशित केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबधित तहसिलदार तथा आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये घटना व्यवस्थापक यांना प्राधिकृत केले होते. यासंबधीची विहित प्रक्रिया राहाता, संगमनेर आणि कोरपगांव तहसील कार्यालयाने अन्य कार्यालयांच्या सहकार्याने पूर्ण केली. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम, कोपरगांवचे तहसीलदार योगेश चंद्रे, निवासी नायब तहसीलदार योगेश कोतवाल, शिर्डी नगर पंचायतचे मुख्याधिकारी सतिश दिघे, कोपरगांव नगर परिषदचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सामेनाथ वाकचौरे, सूर्यतेज सेवाभावी संस्था, कोपरगांवचे संस्थापक समन्वयक सुशांत घोडके, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, रेल्वेस्थानक व्यवस्थापक बी.एस.प्रसाद तसेच तालुका प्रशासनातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रक्रिया पार पाडून संबधितांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. पोलीस निरिक्षक नितीन गोकावे, दीपक गंधाले, मिथुन घुगे तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे रामजी मीना,अनुप देशमुख यांनी आवश्यक पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवला होता. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून संबधित कामगारांना तालुक्याच्या ठिकाणाहून शिर्डी रेल्वेस्थानक येथे आणण्यात आले होते.

सर्व प्रवाशांना यावेळी साई संस्थान प्रशासनाच्यावतीने भोजनाचे पॅकेटस, पाणी, मास्क पुरविण्यात आले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेस्टेशनवर पुरेशा औषधांसह वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. या पथकाने संबधितांची आरोग्यविषयक तपासणी केली. सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन या सर्वांची रेल्वे डब्यात बसायची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने केलेल्या सहकार्याबद्दल याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. लॉकडाऊनमुळे शिर्डी येथे अडकून पडलेल्या 4 हजार 212 कामगारांना यापूर्वीच त्यांच्या मूळ गावी रेल्वेने पाठविण्यात आले आहे.

स्वगृही परत जाण्याचा आनंद सर्व कामगारांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. लॉकडाऊन असतानाही तालुका प्रशासनाने तत्परतेने केलेल्या सहकार्यामुळे तसेच उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील मजूरांना त्यांच्या मूळ गावी जाणे शक्य झाले असून, त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभारी आहोत, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button