सतखेडा येथील NSS शिबिरात वैचारिक प्रबोधन शिवरायांनी जाती धर्माला नाही तर मानवतेला महत्व दिले
धरणगाव प्रतिनिधी – कमलेश पाटील
धरणगाव तालुक्यातील सतखेडा गावातील जि.प.शाळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव जि.जळगांव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एककचे विशेष निवासी शिबीर सुरू आहे. या शिबिरात दुपारच्या बौध्दिक सत्रात ‘छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य कल्पना’ या विषयावर धरणगाव येथील सामजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य-मुंबई:१ अंतर्गत शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगांव च्या राष्ट्रीय सेवा योजना एककच्या माध्यमातून तसेच आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “युवकांचा ध्यास – ग्राम शहर विकास” विशेष निवासी शिबीर धरणगाव तालुक्यातील सतखेडा गावात सुरू आहे. या शिबिरात काल दुपारी बौध्दिक सत्रात धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले. छत्रपती शिवरायांची स्वराज्याची निर्मिती ही अठरा पगड जातींना सोबत घेऊन झाली. बारा बलुतेदार अठरा अलुतेदार समाजातील लोकांना सोबत घेऊन छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं. जाती – धर्माच्या पलीकडे शिवरायांनी मानवतावादी दृष्टिकोन ठेवून तहहयात कार्य केलं. हे सर्व सांगत असतांना आजचा युवक, युवकांची जबाबदारी आणि देश निर्मितीसाठी युवकांचे योगदान या विषयावर देखील व्याख्याते पाटील यांनी भाष्य केलं. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी एका अनामिक मित्राने अतिशय मार्मिक शब्दांत शायरीच्या माध्यमातून हिंदू – मुस्लिम एकतेचा संदेश देत व्याख्यानाचे तोंडभरून कौतुक केले. कार्यक्रमाला NSS कार्यक्रम अधिकारी दिपक.एस.कोळी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संदिप एस.उगले तसेच बाळासाहेब कुमावत का.अधिक्षक बोरोले सर एम.एम.पाटील, कलाल सर पठाण सर, येवले सर यांच्यासह औ.प्र.संस्था जळगाव चे समस्त अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रशेखर आझाद ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.