Korpana

कोणत्याही ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे कनेक्शन कापू नये – आमदार सुभाष धोटे

कोणत्याही ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे कनेक्शन कापू नये – आमदार सुभाष धोटे

मनोज गोरे कोपरना

कोपरना : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांच्या लाखो रुपयांच्या थकीत वीज बिलामुळे ग्रामपंचायतींचे कनेक्शन कापण्यासंदर्भात हालचाली सुरू असून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कर्मचारी व अधिकारी ग्रामपंचायतींना त्याबाबत सूचना देत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती चिंतेत असून यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणताही ग्रामपंचायतींचे पथदिव्यांची वीज कनेक्शन कापू नयेत यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करून सूचना निर्गमित करू अशा पद्धतीचे वक्तव्य आमदार सुभाष धोटे यांनी केले. बिबी, बाखर्डी, निमनी, अंतरगाव (बु.), खिर्डी, वनसडी इत्यादी ग्रामपंचायतींच्या सरपंच शिष्टमंडळाने आमदार सुभाष धोटे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. यासंदर्भात विद्युत मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा आपण चर्चा करून त्यांना कारवाईपासून थांबवू असेही त्यांनी म्हटले.
ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था यासून तीसुद्धा शासनाच एक भाग आहे. जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यापैकी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पथदिव्यांचे वीज बिल कोणी भरायचे? हा प्रश्न दर वेळेस येतो. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असून त्यासाठी ग्रामीण जनतेला अंधारात ठेवणे हा काही पर्याय नाही. पावसाळ्याचे दिवस असून गावात लखलखाट आवश्यक आहे. कोरोनामुळे ग्रामपंचायतींचे उत्पन्न सुद्धा नगण्य आहे. त्यामुळे आधीच ग्रामपंचायती आर्थिक संकटात असताना लाखो रुपयांची वीज बिले भरण्यास सक्षम नाही. त्यामुळे शासनस्तरावर पाठपुरावा करून या संदर्भात तात्काळ मार्ग काढण्यात येईल असेही त्यांनी सरपंचांच्या शिष्टमंडळाला सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button