Jalgaon Live:,उद्यापासून 3 दिवस जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस..!
जळगाव जिल्ह्यात वरुणराजा दमदार बरसत आहे. गेल्या आठवड्याभरापासून जिल्हाभरात मुसळधार पावसामुळे नद्या, नाले वाहू लागले आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे सात मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्याला हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ दिला आहे. आगामी तीन दिवसांत कोठे ना कोठे विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा आहे.
आठवड्यात हवामान खात्याने अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. २३ सप्टेंबरपर्यंत केव्हाही ताशी ३० ते ४० किलोमीटर वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नद्यांवरील लहान व मोठ्या प्रकल्पांचा धरणसाठा १०० टक्के पूर्ण भरलेला आहे. त्यामुळे सर्व लहान व मोठ्या धरणांच्या खालील तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी व नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शेतमाल सुरक्षित स्थळी ठेवावा
शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याच्या सूचना देण्यात आली आहे. बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. हा परतीचा पाऊस ताशी ३० ते ४० किलोमीटर वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह कोसळणार असल्याने पावसादरम्यान विजा व अतिवृष्टीपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.