Nashik

बोधीवृक्ष स्थापना महोत्सवाच्या दृष्टीने सुत्रबद्ध नियोजन करण्यात यावे – मंत्री छगन भुजबळ

बोधीवृक्ष स्थापना महोत्सवाच्या दृष्टीने सुत्रबद्ध नियोजन करण्यात यावे – मंत्री छगन भुजबळ

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-:नाशिक शहरा जवळअसलेल्या त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात येत्या ऑक्टोबर महिन्यात श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या बोधीवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देशभरातून उपासक येणार असल्याने त्यादृष्टीने सोयी-सुविधांचे सुत्रबद्ध नियोजन करण्यात यावे अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपिस्थत अधिकाऱ्यांना दिल्या.

आज मंत्री छगन भुजबळ यांनी त्रिरश्मी बुद्ध लेणी बोधीवृक्ष स्थापनेचे नियोजित स्थळ व सभा ठिकाण यांची पाहणी केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त अकुंश शिंदे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, शहर अभियंता एस.आर.वंजारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आनंद सोनवणे, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदत्न सुगत, भगवान दोंदे, राकेश दोंदे, बॉबी काळे, बाळासाहेब शिंदे, दिलीप साळवे, विकी चाबूकस्वार, उमेश गायकवाड, रमेश जाधव यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, येत्या ऑक्टोबर महिन्यात देशव्यापी बोधीवृक्ष स्थापना महोत्सव शहरात या ठिकाणी महिनाभर होणार आहे. या महोत्सवास श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जापान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने बुद्धस्मारक परिसरात वाहन व्यवस्था, येणाऱ्या बौद्ध उपासकांची निवास, भोजन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था व इतर सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात यावे. तसेच सभेचे नियोजित स्थळी खड्डेभरणी, सपाटीकरण व इतर तांत्रिक अनुषंगिक बाबींची पूर्तता करण्याबाबच्या सूचना मंत्री श्री.भुजबळ यांनी उपस्थित अधिकारी व अभियंता यांना दिल्यात.

बोधीवृक्षाचे ऐतिहासिक महत्व असून इ.स.पूर्व 2566 वर्षांपूवी सिद्धर्थ गौतम बुद्ध यांना निरंजना नदिच्या काठावार बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे हे बोधीवृक्ष अतिपूजनीय आहे. पुढे सम्राट अशोक यांच्या मुलांनी या बोधीवृक्षाची फांदी श्रीलंकेच्या देवानामप्रिय तिरस यांच्या हस्ते अनुराधापूर येथे स्थापित केली. याच बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण नाशिक शहरात करण्यात येणार असल्याने शहराच्या ऐतिहासिक महत्वात भर पडणार असल्याची माहिती शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदत्न सुगत यांनी यावेळी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button