?Big Breaking
महाशिवरात्री पडली महागात
उपवासाच्या भगर मधून याकतपुर गावातील सतरा जणांना विषबाधा
लातुर प्रतिनिधी:- प्रशांत नेटके
●सहा जण औसा ग्रामीण रुग्णालयात भर्ती.
●याकतपुर गावात वैदयकीय पथक दाखल.
●काही रुग्णावर गावातच उपचार.
प्रशांत नेटके
औसा :-काल सर्वत्र महाशिवरात्री मोठया उत्साहात साजरी केली गेली मात्र लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील याकतपुर गावात मात्र वेगळाच प्रकार समोर आला आहे.
महाशिवरात्रीला शुक्रवारी (ता.२१) याकतपुर गावातील लोकांनी उपवासाकरिता भगर आणि साबुदाणा खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली असून, अत्यवस्थ सहा रुग्णावर औसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यातील काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ एक वैद्यकीय पथक याकतपुर गावामध्ये दाखल झाले आहे. या पथकाद्वारे गावातच रुग्णावर उपचार केले जात आहेत.
गावातीलच एका किराणा दुकानातून ही भगर या लोकांनी खरेदी केली होती. या भगर आणि साबुदाण्याचे नमुने घेण्यात आले असून ते प्रयोग शाळेत पाठविले जाणार आहेत.
याकतपुर (ता. औसा) या गावात महाशिवरात्रीचा उपवास असल्याने अनेक लोकांनी गावातीलच किराणा दुकानातून भगर आणि साबुदाणा खरेदी करून तो खाल्ला. थोड्या वेळाने त्यांना मळमळ, चक्कर, जुलाब आणि उलट्या सुरू झाल्या.
त्यामुळे बब्रुवान दिनकर लोखंडे (४९),नंदाबाई बब्रुवान लोखंडे (४८),बाळू बब्रुवान लोखंडे (२६),अक्षता बाळू लोखंडे (७) या एकाच कुटुंबातील चार व्यक्तीना तर मंगल मुरलीधर चव्हाण (५२), सत्यभामा भास्कर मोरे (४५) यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यांच्या व्यतिरिक्त गावातील सोनाली दत्ता औटी (२५), वीरभद्र बब्रुवाहन लोखंडे (२३), मंगल लक्ष्मण चव्हाण (२२), प्राजक्ता बाळू लोखंडे (२०), गंगासागर सूर्यकांत गवळी (१८), बन्सी भास्कर मोरे (२७), लक्ष्मी बालाजी माने (१८), अश्विनी सूर्यकांत गवळी (१५), व्यंकट बाजीराव मोरे (७०), नम्रता गोविंद मोरे (२२), मनीषा अशोक गवळी(३८) यांच्यापैकी कांहीवर खाजगी रुग्णालयात तर कांहीवर वैदयकीय पथकाद्वारे उपचार केले जात आहेत.