Chalisgaon

पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे आद्यकर्तव्य – आमदार मंगेश चव्हाण

पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे आद्यकर्तव्य – आमदार मंगेश चव्हाण

नितीन माळे
चाळीसगाव येथे क्राईम अॅड करपशन कंट्रोल असोसिएशन व शिक्षण विभाग पंचायत समिती चाळीसगांव यांच्या संयुक्त विद्यमानाने चाळीसगांव येथे “Largest Environment protection Awareness Rally” संपन्न

चाळीसगाव – निसर्ग ही ईश्‍वराने निर्माण केलेली अद्भूत गोष्ट आहे. मानवाने आपले जीवन समृद्ध करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करुन आपले जीवन सुसमृद्ध करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरणात अनेक बदल केले. वाहतुकीसाठी रस्ते, राहण्यासाठी घरे, शेती, धरणे अशा अनेक घटकांची निर्मिती केली व करीत असून या सर्व घटकांचा परिणाम पर्यावरणावर होताना दिसतो. पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत जाणारा र्‍हास व त्याचे सजीव सृष्टी व मानवी जीवनावर होणारे परिणाम आज आपल्याला अनुभवायला मिळतात.

पर्यावरणातील प्रत्येक सजीव घटकाचे संवर्धन करणे ही आपली एक सामाजिक जबाबदारी व आद्यकर्तव्य आहे. म्हणून जनजागृती म्हणून आपण प्रत्येकाने सहभागी होऊन अथवा पर्यावरणासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थामध्ये सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडल्यास पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होईल असे प्रतिपादन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.

ते चाळीसगाव येथे क्राईम अॅड करपशन कंट्रोल असोसिएशन व शिक्षण विभाग पंचायत समिती चाळीसगांव यांच्या संयुक्त विद्यमानाने चाळीसगांव येथे “Largest Environment protection A wareness Rally” च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी क्राईम अंड करप्शन कंट्रोल असोसिएशनचे दिनेश जी गुप्ता, गटशिक्षणाधिकारी विलास भोई, संघटनेचे बाबासाहेब कछवा, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष संजय वाघ सर,
क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनचे जळगाव जिल्हा अध्यक्ष अश्विन खैरनार, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष गणेश चौधरी, व्यापारी असोसिएशनचे प्रदीप देशमुख, विनोद पवार, तालुका अध्यक्ष संतोष महाले, पर्यावरण मित्र शालिग्राम निकम किमया प्रतिष्ठान, तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, सर्व केंद्रप्रमुख व त्यांच्या संघटना, सीनियर कॉलेजचे प्राचार्य एस.आर.जाधव, ज्युनियर कॉलेज प्राचार्य शेखर देशमुख, समाजसेवक कैलास पाटील आदी उपस्थित होते.

क्राईम अँड करप्शन कंट्रोल व शिक्षण विभाग,चाळीसगाव आयोजित ह्या रॅली मध्ये तालुक्यातील तब्बल 25000 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले असून रॅलीत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड देण्यात आलेला आहे.प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.पर्यावरण संवर्धन करण्यासाठी व प्रदूषण निर्मूलनाची शपथ या ठिकाणी घेतली गेली.

क्राईम अँड करप्शन कंट्रोल चे अध्यक्ष दिनेश गुप्ता यांनी या कार्यक्रमामागची भूमिका सांगीतली तसेच प्रस्ताविक गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी केले.सूत्रसंचालन भैय्यासाहेब वाघ यांनी केले.

पुढे मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, केवळ नावापुरते वृक्षारोपण करून, फोटो काढून नंतर आपण विसरून जातो, त्या झाडांची काळजी घेतली जात नाही मात्र या उपक्रमाच्या माध्यमातून नंतर झाडांचे ३ वर्ष जतन करणाऱ्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याने एक वेगळा आदर्श आपण यानिमित्ताने जगासमोर घालून देत आहोत. या सर्व कार्यक्रमाची जागतिक स्तरावर दखल घेतली जात असून याची “Largest Environment protection A wareness Rally” या नावाने वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे. आज या रॅलीच्या निमित्ताने मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा घेऊन ‘स्वच्छ भारत अभियान’ याची शपथ देखील घेतली गेली व हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शहरातून निघालेली प्रदूषणमुक्त महाराष्ट्र रॅली ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

प्रदूषण व त्यामुळे होणारे भिषण परिणाम यावर बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी आकडेवारीसह सांगितले की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षात पृथ्वीच्या तापमानात जेवढी वाढ झाली आहे, त्यापैकी ८५ टक्के तापमानवाढ एकटय़ा कार्बन डाय-ऑक्साइडमुळे झाली आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण भूभागापैकी ३३ टक्के क्षेत्र हरित आच्छादनाखाली म्हणजेच वनांखाली असणे आवश्यक मानले जाते. मात्र, प्रत्यक्षात हे प्रमाण राखण्याऐवजी दिवसेंदिवस यातही घटच होत आहे. गेल्या २५ वर्षात भारताच्या बाबतीत विचार करता, भारतामध्ये १९८० ते २००५ या कालावधीत १ लाख, ६४ हजार ६१० हेक्टर जंगलांचे खाणींमध्ये रूपांतर झाले आहे. ‘भारतीय वन सर्वेक्षण संस्थे’च्या नोंदीनुसार, २००९ ते २०११ या कालावधीत देशात एकंदर ३६७ चौरस किमी जंगलांचा नाश झाला आहे. भारतातील नैसर्गिक जंगले दरवर्षी १.५ ते २.७ टक्के या वेगाने घटत चालली आहेत.

अशा प्रकारे एका बाजूला आपण प्रदूषण वाढवत आहोत, तर दुस-या बाजूला प्रदूषण रोखणारी वने नष्ट करत आहोत. याचे गंभीर परिणामही आता दिसू लागले आहेत. सन २००० पासून जगभरात प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूमध्ये ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यापैकी ६५ टक्के मृत्यू आशियात होत आहेत. ‘जागतिक आरोग्य संघटने’नुसार जगभरात दरवर्षी ३.२ दशलक्ष मृत्यू प्रदूषणाशी निगडित आजारांनी होत आहेत. शिवाय स्वाईन फ्ल्यूसारखे नवनवीन आजार जगभरात पसरत आहेत. पर्यावरणाचे रक्षण म्हणून प्रत्येकाने वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करावे व इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा! जीवन वाचवा! देश वाचवा! या उक्ती प्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button