?️ अमळनेर कट्टा… आमदार श्री.अनिल दादा यांना आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेने निवेदन देत घातले साकडे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांची भेट घडवून आणण्याची केली मागणी
अमळनेर : राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका आणि ०४ हजार गटप्रवर्तक गेल्या १० ते १२ वर्षांपासून कार्यरत आहेत.आशा स्वयंसेविकांना सुमारे ८० पेक्षा जास्त विविध प्रकारची कामे करावी लागतात.त्याबदल्यात त्यांना कामानुसार मोबदला अदा केला जातो तर गटप्रवर्तकांना दरमहा प्रवासभत्ता म्हणून ७५००/- ते ८२००/- रूपये अदा केले जातात.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांमुळे घराघरांत आरोग्य सेवा पोहचली.शिवाय कोरोनाच्या महामारीत जिवाची पर्वा न करता शासनाच्या तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोनासंबंधित सर्व कामे आघाडीने करीत आहेत.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या खालील मागण्या मान्य होईपर्यंत दि.१४ जून पासून राज्यभर काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करत आंदोलन सुरू केले आहे.सदर आंदोलनाला आज ९ दिवस उलटले आहेत.तरी शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही.म्हणून संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. अनिल दादा पाटील यांची संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज निवासस्थानी भेट घेत निवेदन दिले.आणि आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मा.मुख्यमंत्री किंवा मा.आरोग्य मंत्री यांची भेट घडवून आणावी असे अनिल दादांना शिष्टमंडळाने साकडे घातले.यावर चर्चेसाठी भेट घडवून आणण्याचा निश्चितच प्रयत्न करेल असे आमदार अनिल दादांनी शिष्टमंडळाने आश्वाशित केले.
मागण्या- *१)* आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक आठवड्याभर दररोज आठ तासांपेक्षा जास्त काम करत असून त्यांचे काम अत्यंत आवश्यक असल्याने त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करण्यात यावे. *२)* आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवाशर्ती लागू करेपर्यंत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना किमान वेतनाइतके वेतन देण्यात यावे *३)* आशा स्वयंसेविका नियमित कर्मचारी नसल्याने त्यांना रॅपिड ॶॅंटिजेन चाचणी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये. *४)* आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे दरवर्षी भाऊबीज भेट देण्यात यावी.*५)* कोरोनाने बाधित होऊन म्रुत्यू झालेल्या आशा स्वयंसेविकांच्या वारसांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ५० लाख रुपयांचा लाभ देण्यात यावा.*६)* दि.१७ जुलै २०२० रोजीच्या शासन आदेशानुसार दरमहा मानधनवाढ लागू करण्यात यावी.*७)* आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना कामकाज करण्यासाठी मोबाईल व लॅपटॉप पुरविण्यात यावेत.*८)* आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सादिल(स्टेशनरी) खर्च आणि मोबाईल रिचार्जची रक्कम वाढविण्यात यावी तसेच गणवेशासाठी १२००/- ऐवजी २०००/-रुपये करण्यात यावे.*९)* आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सेवानिवृत्तीचे वय निश्चित करून त्यांना दरमहा पेन्शन लागू करण्यात यावे.*१०)* आशा स्वयंसेविकांना कामाचा थकीत मोबदला तात्काळ अदा करून यापुढे दरमहा वेळेवर अदा करण्यात यावा. *११)* आशा स्वयंसेविकांना दारिद्र्य रेषेखालील आणि वरील असा भेदभाव न करता कामाचा सरसकट मोबदला अदा करण्यात यावा.
शिष्टमंडळात रामकृष्ण बी.पाटील,सुनंदा पाटील,कविता बोरसे,तस्लिमबी पठाण, प्रगती घाणेकर,प्रतिभा कोळी,सिमा बाविस्कर,पुजा पांडे,सुनिता कापडणे,साधना खंगार, ज्योती कोळी,प्रतिभा साबळे,निता सोनार,अंजली कोळी यांच्यासह अन्य प्रतिनिधींनी भागिदारी केली.






