राज्यातील शिक्षक बदल्या होणार त्रुटीमुक्त
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे – राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी नियुक्त केलेल्या पाच सदस्यीय अभ्यासगटाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवडाभरात हे काम संपणार असून, मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा अभ्यासगट राज्य सरकारकडे अहवाल सादर करेल. या अहवालातून निघालेल्या निष्कर्षानुसार नव्या शिफारशी केल्या जाणार आहेत.
अभ्यासगटाचा अहवाल आणि बदल्यांबाबतचा नवा अध्यादेश लिहिण्यासाठी दोन स्वतंत्र उपसमित्यांची स्थापना केली आहे. अहवाल लेखन उपसमितीच्या अध्यक्षपदी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अध्यादेश लेखन उपसमितीच्या अध्यक्षपदी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती केली आहे, असे या अभ्यासगटाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
शिक्षकांच्या बदल्यांचे नवे धोरण १७ फेब्रुवारी २०१७ पासून अमलात आले. यानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या या राज्यस्तरावरून ऑनलाइन पद्धतीने केल्या जात आहेत. या प्रक्रियेत अनेक त्रुटी राहिल्याचा आरोप शिक्षकांकडून होत होता. यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा अभ्यासगट नेमला आहे.
या अभ्यासगटाने आतापर्यंत पुणे, कोकण, नाशिक आणि औरंगाबाद या चार महसूल विभागांतील शिक्षक संघटना प्रतिनिधी, जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अन्य लोकप्रतिनिधींची मते जाणून घेतली आहेत. अमरावती आणि मंगळवारी (ता.२५) नागपूर विभागातील शिक्षकांच्या भावना जाणून घेतल्या जाणार आहेत.






