तर पक्षाने सांगितले तरी अर्ज भरणार नाही भगीरथ भालके यांचे आव्हान
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : दिगवंत आ.भारत भालके हे अकरा वर्षे आमदार असताना आपण कोणालाही कधीही त्रास दिलेला नाही. एका व्यक्तीने जरी आपण त्रास दिल्याचे दाखवून दिले तर उमेदवारी अर्ज भरणार नाही असे भावुक विधान विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी केले.
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही.तथापि, उमेदवारी निश्चित मिळणार या खात्रीने भगीरथ भालके यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन प्रचाराला वेगाने सुरवात केली आहे.एखादी गोष्ट चांगली नाही झाली तरी चालेल परंतु कोणाच्याही भावना दुखावता कामा नयेत, अशी नानांची शिकवण होती. त्यामुळे त्यांच्या रक्ताचा वारस असण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा वारस म्हणून आपण चांगल्या पद्धतीने काम करून दाखवू.श्री. भालके म्हणाले, (कै.) भारत भालके यांच्या निधनानंतर गेल्या चार महिन्यांच्या काळात सर्वांनी धीर दिला आणि लढण्याची ताकद दिली. त्यांच्या पश्चात मी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. गेल्या चार दिवसांत मंगळवेढा शहरात पंचावन्न ठिकाणी बैठका घेतल्या.आता पंढरपूर शहरात ठिकठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपण बैठका घेणार आहे. काही जणांना निरोप गेले असतील काही जणांना निरोप मिळालाही नसेल; परंतु परिस्थिती लक्षात घेऊन कोणीही गैरसमज करून घेऊ नये.(कै.) भालके यांनी शेवटपर्यंत विठ्ठल परिवार एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्त्यांना माझे आवाहन आहे, की कोणीही टीका- टिप्पणी केली तरी विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांची भावना दुखावेल असे कृत्य कोणीही करू नये.शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना अशा सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचे आहे, असे भगीरथ भालके यांनी नमूद केले.