Amalner: अवैध वाळू खून प्रकरण..! मांडळ येथील तलाठ्यास निलंबित करण्याचा प्रांताधिकारी यांच्याकडे प्रस्ताव …
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथील अवैध वाळू वाहतुकीवरून खून झाल्याने मांडळ येथील तलाठ्याला निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रांताधिकारीनकडे पाठवण्यात आला आहे. तर अटकेत असलेल्या तीन आरोपीना न्यायालयाने
सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तसेच फरार आरोपींच्या शोधार्थ एलसीबीचे स्वतंत्र आणि मारवड पोलीस स्टेशनचे स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे शेताशेजारच्या नाल्यातून वाळू वाहतूक करू नये म्हणून विरोध करायला गेलेल्या जयवंत कोळी याचा सहा जणांनी खून केल्याचा आरोप झाला. मयताच्या नातेवाईकांनी महसूल खात्यावरही आरोप केले होते. सहा जणांवर मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने व त्यांच्या पथकाने सागर अशोक कोळी, गोल उर्फ देविदास नरेश कोळी, रोहित बुधा पारधी याना अटक केली होती. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एस. एस. जोंधळे यांनी सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या पार्श्वभूमीवर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी देखील दखल घेऊन राजेंद्र तोतारांम दाभाडे या मांडळ येथील तलाठ्याला निलंबित करण्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. तसेच
निमझरी येथील तलाठी नितीन गोविंद कोचुरे यांनी कामात कुचराई, वसुली न करणे आदी कारणामुळे त्यांना विना वेतन कार्यमुक्त करण्यात आले आहे. तर डांगरी येथील तलाठी गणेश पाटील हे पण गैरहजर राहणे, कामास विलंब करणे ,सजेवर जात नाही म्हणून त्यांच्यावरही निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.