Nanded

एका सिव्हिल इंजिनियरची कमाल !डासांना करणार हद्दपार

? एका सिव्हिल इंजिनियरने केलेली कमाल !
आज आपल्या आजु बाजूला जर बघितले तर चिरटाचे व डासांचे साम्राज्य आहे पण तेच नष्ट झाले तर….
डासांना हद्दपार करणारी गावं!

शहरं असोत वा खेडी किंवा वाड्या-वस्त्या…‘डास आमच्याकडं नाहीत’, असं कुणालाही खात्रीनं सांगता येणार नाही. मात्र, मराठवाड्यातल्या काही गावांनी हा चमत्कार घडवून आणला आहे. तिथं डासच काय, पण दुर्गंधीयुक्त पाण्यामुळं निर्माण होणारे कसलेही कीटक नाहीत. कसा घडवला गावकऱ्यांनी हा चमत्कार, कोणतं तंत्र वापरलं याची ही रोचक कथा…

मुक्काम टेंभुर्णी (ता. हिमायतनगर, जि. नांदेड). वेळ संध्याकाळची. पैजेचा विडा उचलूनच आम्ही या गावात डेरेदाखल झालो होतो. ‘आमच्या गावात एकही डास नाही; चावायचे दूरच, कानात नुसता आवाज आला तरी वाट्टेल ती पैज हरायला तयार आहोत’, सरपंच प्रल्हाद पाटलांचं हे आव्हान स्वीकारलं होतं. कारण डासाविना गाव, कुणालाही केवळ बाताच वाटतील.

टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या जवळच हातपंप आहे. तेथील कोरडेठाकपणा पाहून सहजच विचारलं, ‘याला पाणी नाही का येत?’ तेवढ्यात एक चड्डीतलं पोर पुढं आलं आणि हापसू लागलं. काही सेकंदांतच पाणी वाहू लागले. पाण्याच्या स्रोताभोवती एवढा कोरडेपणा कसा काय, असा सवाल पाटलांना केला असता, चला ग्रामपंचायतीत बसून सांगतो, असे म्हणत ते चालू लागले.

एका सिव्हिल इंजिनियरची कमाल !डासांना करणार हद्दपार

टेंभुर्णी गाव : येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारे नाहीत. ‘मॅजिक पिट’मुळे गटारांवरील खर्च वाचला.

टेंभुर्णी हे १९५४ च्या पुरानंतर या ठिकाणी पुनवर्सित झालेले गाव. पूर्वीपेक्षा जागा कमी मिळाली, तरीदेखील आम्ही ‘ॲडजेस्ट’ करून राहू लागलो, अशी गावकऱ्यांची व्यथा. पूर्वीपासून गावात पाण्याचं दुर्भिक्ष. गावात बोअरवेल खोदल्या तरी त्या कोरड्याच जायच्या. दूरवरून पाणी आणावं लागायचं. १९८६-८७ च्या दरम्यान गावातला एक तरुण इंजिनिअर (बी.ई.) झाला. तो गावचा पहिला उच्चशिक्षित. खूप प्रयत्न करूनदेखील त्याला नोकरी लागली नाही. कारण तेव्हाचं ‘झिरो बजेट’ आडवं आलं. शेवटी गावातच राहून विकासकामांना जुंपण्याची त्यानं प्रतिज्ञा केली. तो तरुण म्हणजेच गावचे सरंपच प्रल्हाद पाटील. गेल्या २० वर्षांपासून निर्विवादपणे ते गावासाठी राबत आहेत.

‘मॅजिक पिट’ची माहिती देताना नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे.

गाव स्वच्छ ठेवण्याचा पहिला संकल्प त्यांनी केला. प्रत्येक घराच्या मोरीतून वाहणारं पाणी हा कळीचा विषय होता. पाटलांनी शोषखड्ड्याबाबत खूप वाचलं होतं. त्यांनी हा प्रयोग राबवला. मात्र काही दिवसांनी शोषखड्डे भरले आणि पुन्हा दुर्गंधी. त्यावर पाटलांनी नवी शक्कल लढवली, संशोधन केलं असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळं हा प्रश्‍न कायमचा सुटला. गेल्या सहा वर्षांपासून मोरीच्या पाण्याचा थेंबदेखील रस्त्यावर आलेला नाही. आज प्रत्येक कुटुंबानं नव्या पद्धतीचे शोषखड्डे करून अख्खं गाव गटारमुक्त केले आहे. गाव गटारमुक्त झाल्यानं डास गायब झाले. पाटील सांगतात, ‘‘साऱ्या गावाला यासाठी राजी करणं खूप अवघड काम होतं. आधी मी माझ्या घरी हा प्रयोग केला. तरीही आमच्या भिंतीत पाणी मुरेल, घर पडेल अशी भीती व्यक्त केली जायची. मात्र माझ्या प्रयोगाला काही काळ लोटल्यानंतर लोकांना अखेर पटलं आणि त्यांनी स्वखर्चाने हा प्रयोग राबवला.’’

डासांना गावातून पिटाळणं हा चमत्कारच नव्हे का? त्याचे इतरही अनेक फायदे गावाला झाले. डासजन्य आजार संपले, गावाला गटारांची गरजच उरली नाही आणि जमिनीतून पाणी मुरल्यामुळं गावातल्या कुपनलिका आणि विहिरीला पाणी आलं. २००८ पासून गावात टॅंकर सुरू होते; मात्र २०१३ पासून त्याची गरजच संपली. असे चमत्कारावर चमत्कार एका आधुनिक शोषखड्ड्यानं केले.

एका सिव्हिल इंजिनियरची कमाल !डासांना करणार हद्दपार

??चारशेंवर गावांमध्ये प्रयोग

पाटलांचा हा प्रयोग हिमायतनगर, हदगाव, भोकर, लोहा आदी तालुक्‍यांतील चारशेंवर गावांमध्ये पोचल्याची माहिती मिळाली. या साऱ्यामागे कोण आहे याचा शोध घेण्याचे ठरवले आणि एक अत्यंत उत्साही व प्रचंड धडपड्या अशा वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट झाली. पाटलांचा प्रयोग डोक्‍यावर घेऊन त्याची तोंडभरून तारीफ करताना त्याला देशपातळीवर कसे पोचवलं याची इत्यंभूत माहिती त्यांनी दिली. हे अधिकारी म्हणजे नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे. चारशेंवर गावे येत्या तीन महिन्यांत डासमुक्त करण्याचा संकल्प सोडून संपूर्ण जिल्हा डासमुक्त करण्याचं स्वप्न पाहणारे अधिकारी.
त्यांना या चमत्कारामागील पार्श्‍वभूमी विचारली असता, अधिक न बोलता त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीच अवगत करून देतो म्हणून थेट गावांना भेटी घडवून आणल्या. भालकी, कारवाडी (ता. नांदेड), लहान, लहान तांडा (ता. अर्धापूर), अमदरी (ता. भोकर), टेंभुर्णी, मोरगाव (ता. हिमायतनगर), धन्याची वाडी (ता. हदगाव) आदी गावांचा फेरफटका आम्ही मारला. प्रत्येक गावाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख होती. पण एक समान धागा होता, प्रत्येक घराची मोरी शोषखड्ड्यांना जोडलेली होती.

एका सिव्हिल इंजिनियरची कमाल !डासांना करणार हद्दपार

??साधा शोषखड्डा ते मॅजिक पिट

साध्या शोषखड्ड्यांची योजना यापूर्वीही महाराष्ट्रात राबविण्यात आली होती, अगदी शासकीय परिपत्रक काढून. मात्र ही योजना फार काळ टिकली नाही. त्यातले दोष पाटील यांनी दूर केले आणि काळे यांनी तिला आधुनिक रूप दिलं आणि त्यांनी तिचं नामकरण केलं ‘मॅजिक पिट’. खरोखरच हा नव्या स्वरूपातील खड्डा जादूई असाच म्हणावा लागेल. त्यामुळं नांदेडच्या ग्रामीण भागातून नव्या क्रांतीचा उदय होत आहे. ही क्रांती आहे गटारमुक्ती अन्‌ डासमुक्तीची. या क्रांतीचा ध्यास घेऊन ‘अभिमन्यू’ आपल्या सहकाऱ्यांसमवेत लढत आहे. डासमुक्तीच्या जोडीलाच घरोघरी स्वच्छतागृह, प्रत्येक मूल शाळेत हे उपक्रमदेखील अभिनव पद्धतीने राबवले जात आहेत. ही मोहीम जनतेच्या सहभागाशिवाय शक्‍य नव्हती. त्यांचं मनपरिवर्तन घडवून आणणं मोठं आव्हान होते. लोकांचे अनेक प्रश्‍न आणि शंका होत्या. परंतु डोईला गाडगे, हातामध्ये झाडू स्वच्छतेने गाडू अंधश्रद्धा या संत गाडगेमहाराजांच्या विचारांप्रमाणे ते शंका-कुशंकांचं निरसन करत गेले आणि ही मोहीम आता मोठी चळवळ बनली आहे. त्याची दखल केंद्र सरकार, राज्य सरकारनंच नव्हे, तर कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा इत्यादी राज्यांनी घेतली आहे. त्यांची शिष्टमंडळे डासमुक्त गावांना भेटी देऊन ‘मॅजिक पिट’चा पॅटर्न आपल्या राज्यांकडे घेऊन जात आहेत.

एका सिव्हिल इंजिनियरची कमाल !डासांना करणार हद्दपार

??नेमका फरक काय?

शोषखड्डे आणि या मॅजिक पिटमध्ये नेमका फरक काय, हे समजावून सांगण्यासाठीही काळे यांनी प्रत्यक्ष कृतीची जोड दिली. लहान नावाच्या गावामध्ये त्यांनी एक खड्डा उकरायला सांगितला आणि ते स्वत: त्यात उतरले आणि हातात फावडे घेऊन मॅजिक पिट्‌सचा उलगडाच केला. पूर्वीच्या शोषखड्ड्यांमध्ये खड्डे घेऊन त्यात वाळू, विटा, मोठे दगड भरले जात. मात्र ते गाळाने लवकर भरत आणि पाणी मुरण्याऐवजी वर येऊन रस्त्यावर वाहत असे. ‘मॅजिक पिट’मध्ये चार बाय चार वर्तुळाकार खड्डा घेऊन त्यात सिमेंटची टाकी बसवतात. टाकीच्या बाजूचा भाग दगडगोट्यांनीच भरलेला असतो. मोरीचा पाइप टाकीत सोडून ती बंद केली जाते आणि त्यावरून मातीचा थर दिला जातो. त्यामुळे येथे मॅजिक पिट आहे हे कोणाला सांगितल्याशिवाय समजणारही नाही. टाकीच्या वरच्या बाजूला छिद्रे असल्यानं पाणी त्याद्वारे जमिनीत मुरते. गाळ खाली जाऊन बसतो. तीन-चार वर्षांनी टाकी स्वच्छ केली म्हणजे झाले. अत्यंत कमी खर्चात खूप मोठा परिणाम ‘मॅजिक पिट’मुळं साधला जात आहे. हा उपक्रम काळे यांनी शासकीय योजनेमध्ये बसवून त्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये अनुदान देऊ केल्याने त्याला आता मोठा प्रतिसाद मिळत आहे.

घरचे सांडपाणी जमिनीत मुरवल्यानं बोअरवेल आणि विहिरीचे पाणी वाढले खरे; पण ते कितपत पिण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य आहे, असा प्रश्‍न अर्थातच पडला. ही शंका दूर करण्यासाठी नांदेडच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे (जीएसडीए) अभियंता एच. एम. संगनोर यांच्याशी चर्चा केली. टेंभुर्णीतील पाण्याच्या त्यांनी सर्व चाचण्या घेतल्या असता, त्यांनीही आश्‍चर्याने तोंडात बोट घातले. हे पाणी केवळ वापरण्यायोग्यच नव्हे, तर पिण्यायोग्यही होते. मात्र तरीही गावकऱ्यांच्या मनात कसलीही शंका राहू नये म्हणून ‘मॅजिक पिट’ योजना राबविणाऱ्या ४१० गावांमध्ये ‘आरओ वॉटर प्युरिफायर’ दिले जाणार असून, तीन महिन्यांत ते बसवले जाणार आहेत. टेंभुर्णी गावचे वॉटर प्युरिफायर गेल्याच महिन्यात कार्यान्वित झाले. एका ‘मॅजिक पिट’मुळे किती फायदे झाले पाहा. डास गेले, आजार कमी झाले, गटारांची गरज संपली, त्यावरील लाखोंचा खर्च वाचला आणि पाणी समस्यादेखील सुटली. याला क्रांती म्हणायचे नाही तर काय?

?? कुणी विश्‍वास ठेवायलाच तयार नव्हतं

मॅजिक पिट्‌सचं सादरीकरण दिल्ली, मुंबई आदी ठिकाणी केलं. सर्वांच्या बुद्धीला सारे पटायचे; परंतु त्यावर कोणी विश्‍वासच ठेवायला तयार होत नव्हतं, अशी खंत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांची. अनेक अधिकाऱ्यांनी स्वत: जाऊन गावांची पाहणी केली, तरीदेखील त्यांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्‍वास बसत नव्हता. ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी डासमुक्त गावांचा नुकताच दौरा केला. सादरीकरणावर सादरीकरण आणि अधिकाऱ्यांच्या भेटी वाढल्या, राज्य; तसेच देशपातळीवरील संबंधित अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. अखेरीस सरकारनं दखल घेतली आणि ‘मॅजिक पिट पॅटर्न’चा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये समावेश करण्यात आला. तसेच चौदाव्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक सूचीमध्येही त्याचा समावेश झाला.

??केंद्रीय स्वच्छता मंत्र्यांवरही मोहिनी

या ‘नांदेड पॅटर्न’ची खबर केंद्रीय पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री राव वीरेंद्र सिंह यांच्या कानावर गेली. त्यांनी हरियाना सरकारला योजनेची पाहणी करण्याची सूचना केली. त्यानुसार हरियानाच्या मुख्य अतिरिक्त सचिव नौराज सिंधू यांच्यासमोर अभिमन्यू काळे यांनी सादरीकरण केल्यानंतर त्यांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ नुकतेच नांदेड भेटीवर आले होते. त्यांनी या योजनेचे खूप कौतुक केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button