?Big Breaking..काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिव सेनेच्या शिष्टमंडळाचीही कृष्णकुंजवर धाव ; राज ठाकरेंनी फोन केला अन…
मुंबई: पुण्यातील सोमाटणे टोल नाका बंद करण्याप्रकरणी सर्व पक्षीय नेत्यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. तळेगाव येथील टोलनाका बंद करण्यात यावा अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी राज ठाकरेंना केली आहे.
तळेगाव येथील सोमाटणे टोलनाका बंद करण्यात यावा अशी मागणी तळेगावमधील नागरिकांची मागणी आहे.
फक्त दीड किमी अंतरावर २ टोलनाके असल्याने कायद्याला हरताळ फासून टोलनाक्याआडून नागरिकांची लूट सुरु असल्याचं सर्व पक्षीय शिष्टमंडळाने सांगितले.
सर्व पक्षीय शिष्टमंडळानी दिलेल्या माहितीनंतर, ताबडतोब राज ठाकरे यांनी IRB Infrastructureचे विरेंद्र म्हैसकरांना फोन केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील या विषयावर बोलतो, असं सांगितले. त्यानंतर विरेंद्र म्हैसकर यांनी देखील यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असं आश्वासन राज ठाकरेंना दिले.राज ठाकरेंना भेट देणाऱ्या सर्व पक्षीय शिष्टमंडळामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि जनसेवा विकास समिती यांचा समावेश होता, अशी माहिती जनसेवा विकास समिती, तळेगाव दाभाडेचे प्रवक्ते मिलिंद अचुट यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना दिली. तसेच राज ठाकरे यांनी राज्यातील टोलचे प्रश्न व्यवस्थितपणे हातळल्याने आम्ही त्यांची भेट घेतली असं मिलिंद अचुट यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या टोलनाक्याप्रश्नी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेतल्याची माहिती मिलिंद अचुट यांनी दिली.