ऑक्सिजन अभावी होतोय माशांचा मृत्यू तर अफवा कोरोनाची नवनवीन अफवांमुळे मच्छिमारांवर संक्रांत
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर गेल्या आठ दिवसांत तापमानात वाढ व उकड्यात वाढ झाल्याने भीमा नदी पात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात तापत असून यामुळे ऑक्सिजन अभावी अनेक लहान माशांचा मृत्यू होत आहे.मात्र मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील अनेक नदीकाठच्या गावात पाण्यात कोरोना टेस्टिंग किट टाकल्याने माशांचा मृत्यू होत असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्याने नदीकाठच्या मच्छिमार बांधवांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.मच्छिमार बांधवांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवेढा तालुक्यातील नळी,बठाण तसेच पंढरपूर तालुक्यातील सरकोली,आंबे आदींसह या आफवांनी जोर धरला असून अनेक गावांत त्यांना मासेमारी करण्यापासून रोखले जात आहे.कोरोना किट नदीत व ओढ्यात टाकल्याने माशांचा मृत्यु होत असून यामुळे कोरोनाचा धोका वाढेल असे कारण देऊन मच्छिमार बांधवाना मासे पकडण्यापासून रोखले जात आहे.अगोदरच कोरोना व लॉकडाऊनमुळे मासे विक्रीचा व्यवसाय ठप्प असल्याने मच्छिमार समाज अडचणीत आला आहे.त्यातच आपल्याच गावात मिळेल त्या दरात मासे विक्री करून कशीबशी उपजीविका चालविणाऱ्या मच्छिमार बांधवांवर व त्यांच्या कुटुंबावर या अफवांनी संक्रांत आली आहे.याबाबत सोलापूरचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री राजकुमार महाडिक यांना संपर्क केला असता त्यांनी ऑक्सिजन अभावी माशांचा मृत्यू होत असून कोरोनाशी याचा काहीही संबंध नसल्याने कोरोनाच्या अफवा पसरवणे बंद करा असे आवाहन केले आहे.तसेच दोन्ही तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडून याबाबत आपण माहिती घेतली असून मोठ्या प्रमाणात उकाडा वाढल्याने पाण्याच्या पृष्ठभागावर गरम थर तयार होत आहे.यामुळे विशिष्ट प्रकारच्या माशांना अशा गरम पाण्यात ऑक्सिजन घेणे कठीण होते व त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो असे सांगितले.
*कोरोनासाठीच्या सकस आहारात माशांना महत्व*
कोरोनाच्या विरोधातील लढाईत आहाराला मोठे महत्व आहे.यात प्रामुख्याने माशांचा समावेश महत्वाचा मानला जात असून माशांना मोठी मागणी आहे.मासे मोठ्या प्रमाणात प्रोटिनयुक्त व पचायला हलके असल्याने आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा मासे खाण्याचा सल्ला आहार तज्ज्ञांकडून नेहमी दिला जातो.त्यामुळे माशांना मोठी किंमत आली आहे.
“अगोदरच कोरोनामुळे लॉकडाउन घोषित करण्यात आल्याने मासेमारी व मासेविक्री व्यवसाय ठप्प आहे.यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छिमार बांधवांचे हाल सुरू आहेत.त्यातच अशा विविध प्रकारच्या आफवांनी त्यांना विनाकारण त्रास होत आहे.प्रत्येक वर्षी उन्हाळयात पाणी तापू लागले की कमी पाण्यात आढळणाऱ्या तसेच पृष्ठ भागावर अवलंबून असणाऱ्या विशिष्ठ प्रकारच्या माशांचा मृत्यू होतो.त्याचा संबंध कोरोनाशी जोडून काहीजण जोडून विनाकारण अफवा पसरवत आहेत.कोणत्याही मच्छिमार बांधवाला मासे पकडण्यासाठी विरोध केला जात असेल तर त्यांनी माझ्याकडे किंवा आपल्या तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे तक्रार करावी.”
प्रकाश नगरे
मच्छिमार नेते व राज्य उपाध्यक्ष
फिशरमन काँग्रेस कमिटी