नाशिक जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा लक्षात घेऊन पाण्याचे सुक्ष्म पद्धतीने नियोजन करावे : पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे
नाशिक, दि.31 जुलै 2020 (जिमाका) – गतवर्षीच्या तुलनेत यंदा जून व जुलै महिन्यात पाऊस कमी झाल्यामुळे, सध्य परिस्थिती पाहता चिंतेचे वातावरण तयार झालेले आहे. जिल्ह्यातील उपलब्ध धरणसाठा लक्षात घेऊन पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याच्या आरक्षणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
जिल्ह्यातील पाऊस परिस्थिती, धरणसाठा, पीक परिस्थिती आणि जिल्ह्यातील अन्नधान्य पुरवठा आदी बाबींच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे,जिल्हा कृषी अधीक्षक संजय पडवळ, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सागर शिंदे, कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने व संबधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात आज पर्यंतची पावसाची टक्केवारी ४७% असून धरणासाठा देखील समाधानकारक नाही, ही जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब आहे. पाणी काटकसरीने वापरण्याबाबत जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात याव्यात असे त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.
जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी जिल्ह्यातील धरणातील आजचा उपलब्ध पाणी साठाबाबत माहिती देतांना गंगापूर धरण ५२ टक्के, काश्यपी २४टक्के, मुकणे २८टक्के, भावली ८९ टक्के, दारणा ६९ टक्के, वालदेवी ३४ टक्के, पालखेड ३२टक्के, करंजवण १८टक्के, वाघाड १८ टक्के, ओझरखेड ४०टक्के, तीसगाव ८टक्के व पुणेगाव ११ टक्के पाणीसाठा असल्याचे सांगितले. गतवर्षीत तुलनेत हा उपलब्ध साठा फारच कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी यावेळी कृषी विभागाचा आढावा सादर केला.जिल्ह्याच्या पूर्व भागात समाधानकाराक पाऊस झाला असून जिल्ह्यात भात पेरणी वगळता सर्व पेरण्या समाधानकारक झालेल्या आहेत. जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा असून यात युरियाचा १०८ टक्के अधिकचा साठा उपलब्ध आहे. ५१२ मे.टन बफर साठ्यापैकी ३०० मे.टन बफर स्टॉकचे वितरण झाले असून २१४मे.टन साठा हा वाटपासाठी शिल्लक आहे. जिल्ह्यात हेक्टरी मका पेरणी १०७टक्के, , एकूण तृणधान्ये पेरणी ८२.८४टक्के, तुर पेरणी ६३.८६टक्के, भात पेरणी ५६.५२. टक्के, ज्वारी पेरणी २७७.५८. टक्के, बाजरी पेरणी ७१.२२ टक्के, नाचणी पेरणी ३०.७४ टक्के, भूईमुग पेरणी ९८.0८ टक्के, कापूस पेरणी ९५.0५टक्के झाली असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील पुरवठा विषयक माहिती देताना जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी जिल्ह्यात सध्या ३५ हजार मॅट्रिक टन धान्य साठवणूक क्षमता आहे. यामध्ये कोव्हीड कालखंडात १४ हजार मॅट्रिक टन साठवणूक क्षमता वाढवली आहे. जिल्ह्यात आणखी २५हजार मॅट्रिक टन धान्य पुरवठ्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली आहे






