आरोग्य चा मुलमंत्र…पावसाळा आणि आरोग्याची काळजी
वरूणराजाचे आगमन सर्वांनाच हवेहवेसे आणि सुखावणारे असते. मात्र पावसाळ्यात आरोग्यरक्षणाकडे विशेष लक्ष द्यायला हवे. अन्यथा अनेक आजार बळावण्याची शक्यता असते. म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
1) पावसाळ्याच्या काळात सर्व प्रकारच्या भाज्या व फळे स्वच्छ धुवून घ्यावीत. फळभाज्या स्वच्छ धुतल्या नाहीत तर पोटाचे विकार होण्याची वाढीला लागते.
2) विशेषतः पावसाळ्याच्या काळात हलके जेवण घ्यावे. हलके जेवण पचण्यास सोपे असते.
3) पावसाळ्याच्या दिवसात तिखट, कांदा भजी, बटाटावडा असे तेलकट पदार्थ खाण्याचा मोह होतोच. मात्र तेल तसेच मसाल्याच्या पदार्थांपासून शक्यतो दूर राहावे.
4) बराच काळ उघड्यावर राहिलेले खाद्यपदार्थ शरीरात इन्फेक्शन निर्माण करू शकतात. त्यामुळे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
5) पावसाळ्यात पाणी उकळवून पिण्याचा सल्ला दिला जातो. तो अगदी अवश्य पाळावा. पावसाळ्याच्या दिवसात जेवताना गरम पाणी पिणेही हितकाराक आहे.
6) पावसाळ्यात शरीराचे तापमान तुलनेने कमी असते. अशावेळी जीवजंतू शरीरावर चटकन हल्ला करतात. म्हणून स्वतःला जास्तीत-जास्त उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा.
7) तुमचे बूट, मोजे आणि रेनकोट जास्तवेळ ओले अंगावर राहू देऊ नका. यामुळे इन्फेक्शन होण्याची दात शक्यता असते.
8) घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. छतावर, टायरमध्ये पाणी साचू देऊ नये. तसेच औषध फवारणी करून घ्यावी.
9) पावसाळ्यात थंड वातावरणामुळे शरीरातील वातदोष वाढलेला दिसतो. त्यामुळे गरम पाण्यानेच आंघोळ करावी.
10) पावसाळ्यात आंघोळीसाठी कडूनिंबाची पाणे घालून गरम केलेले पाणी वापरावे. यामुळे जीवजंतूंचा प्रादुर्भाव टाळता येतो.
डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
होमिओपॅथी तज्ञ