परंडा शहरामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे
परंडा स्वच्छ भारत अभियान या उपक्रमा अंतर्गत शासनाने कोट्यावधी रूपयांचा निधी उपलब्ध केला असताना परंडा शहरात मात्र जागोजागी तुंबलेल्या गटारी व साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगामुळे रोगांचे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असुन ऐन पावसाळ्यामध्ये शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसुन येत आहे.
शहरामध्ये बऱ्याच प्रभागात बहुतांश ठिकाणी गटारीवर अतिक्रमण करून बांधकामे करण्यात आल्यामुळे मजुरांना गटारी काढताना अडचण येते. गटारी व्यवस्थीत साफ होत नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही व गटारी तुंबल्या जातात. त्यामुळे ऐन पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढुन साथीचे रोग वाढण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे शासन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याचे आवाहन करत आहे मात्र दुसरीकडे परंडा शहरात स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील आठ दिवसापासुन शहरात घंटागाड्या देखील बंद असुन शहरातील प्रमुख मार्गावर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचल्याचे दिसुन येतआहे. अनेक सार्वजनिक शौचालयाच्या परिसरामध्ये मोठे गवत वाढल्यामुळे नागरीकांना आपला जिव मुठीत धरून त्यामधुन रस्ता काढुन शौचासाठी जाण्याची वेळ आल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरामधील या वाढत्या समस्यांबाबत मुख्याधीकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन ला उत्तर दिले नाही.
शहरात कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने नागरीकांत भितीचे वातावरण आहे त्याचबरोबर अस्वच्छतेचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरीकातुन नाराजी व्यक्त होत आहे. वरीष्ठ पातळीवरून याकडे लक्ष देऊन स्वच्छतेच्या अडचणी सोडवाव्या, अशी मागणी नागरीकांतुन होत आहे.