फक्त दूधाचीच विक्री करणाऱ्या केंद्रांना वेळेचे बंधन लागू नाही
जळगाव, दि. 15 :- राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 दिनांक 13 मार्चपासुन लागु करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे.
जळगाव जिल्ह्यातील शहरी भागातील नागरिक अनावश्यकरित्या रस्त्यांवर फिरुन गर्दी करताना दिसून येत आहे. तसेच सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील किराणा दुकाने, भाजीपाला, फळे व दूध विक्रेत्यांना वेळेचे बंधन घालून दिले आहे. मात्र सर्व दूध विक्री केंद्रे अथवा गल्लोगल्ली जाऊन विक्री करणारे विक्रेते यांना वेळेचे बंधन लागू असणार नाही. अशी दुध विक्री केंद्रे ज्या ठिकाणी दुध व त्यासोबत अन्य कोणत्याही पदार्थांची विक्री केली जाते. (उदा. बेकरीचे पदार्थ, किरकोळ वस्तु व तत्सम पदार्थ) अशा दुध विक्री केंद्रांना मात्र आदेशात नमूद वेळेचे पालन करणे बंधनकारक राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.