Maharashtra

बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन

बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन

फहिम शेख

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 29 : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीची बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या अनुषंगाने नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.

सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावीत. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.

कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन आरोग्य पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगर पालिका, नगर पंचायत,पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

00000

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button