व्यवसाय ठप्प झाल्याने सलून चालकाची गळफास घेऊन आत्महत्या
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : कर्जबाजारीपणा आणि व्यवसाय ठप्प झाल्याने एका सलूनचालकाने बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विलास उत्तम ठाकरे असे आत्महत्या केलेल्या सलूनचालकाचे नाव आहे.
कर्जबाजारीपणा आणि व्यवसाय ठप्प असल्यामुळे, त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. कैलासनगर येथील विलास यांचे भोईवाडा येथे सलून दुकान होते. लॉकडाऊनमुळे त्यांचे दुकान गतवर्षी बंद होते.
यामुळे ते कर्जबाजारी झाले होते. या वर्षी पुन्हा लॉकडाऊन लागल्यापासून त्यांचे दुकान बंद आहे. त्यामुळे ते नैराश्यात होते. बुधवारी रात्री त्यांनी पत्नीशी फोनवर संवाद साधला. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. याविषयी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.