Jalgaon

Jalgaon Live: एकाच रात्री तीन खून… जळगाव हादरलं… कायदा आणि सुव्यवस्था डब्ब्यात…

Jalgaon Live: एकाच रात्री तीन खून… जळगाव हादरलं… कायदा आणि सुव्यवस्था डब्ब्यात…

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची तलवार आणि चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल शुक्रवारी रात्री घडली. रात्री १० वाजेच्या सुमारास ही भयंकर घटना घडली आहे. शांताराम भोलानाथ साळुंखे (वय ३३) आणि राकेश भोलानाथ साळुंखे (वय २८) अशी मयतांची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास सुरु होत नाही, तोच मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतचा देखील मर्डर झाला. एकाच रात्री एकामागून एक तब्बल तीन खून झाल्याच्या या घटनेनं जळगाव जिल्हा हादरला आहे.
भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम साळुंखे आणि राकेश साळुंखे या भावंडांचा गावातील एक कुटुंबाशी जुना वाद आहे. त्या वादातून शुक्रवारी हल्लेखोरांनी भावंडांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात तलवारीसह चाकूचा सपासप वापर करण्यात आल्याने दोघं भावांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना ट्रामा केअर सेंटरला हलवण्यात आले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

कंडारीतील दुहेरी खुनाची घटना समोर आल्यानंतर भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण आणि बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रामा सेंटरमध्ये रवाना करण्यात आले आहे. पोलिसांना आतापर्यंत संशयित म्हणून दीपक छगन तायडे आणि मनोज मोरे यांची नावे समोर आली असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

दुहेरी हत्याकांडानंतर पुन्हा तिसरा खून
दोन खुनाच्या घटनाना काही तास उलटत नाही तोच पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार म्हणून ख्याती असलेल्या निखील राजपूत याची हत्या झाली. भुसावळ शहरातील श्रीराम नगराजवळील पाण्याच्या टाकीजवळ त्याचे वास्तव्य होते. शुक्रवारी रात्री निखील हा घरी आल्यानंतर काही संशयितांसोबत पाण्याच्या टाकीच्या टेरेसवर झोपला असता त्याचा वाद झाला आणि वादातून त्याच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करीत खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले असून कौटुंबिक वादातून त्याने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे २४ तासांपूर्वीच निखीलसह त्याच्या सहकाऱ्यांनी बाजारपेठ पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
खुनाची घटना समोर आल्यानंतर जळगाव पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. एकाच रात्रीतून तीन खुनाच्या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button