कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सारोळा ग्रामपंचायतीचे महत्वपूर्ण पाऊल; ८ हजार मास्कचे मोफत वाटप
उस्मानाबाद प्रतिनिधी:- प्रशांत नेटके
ठोस प्रहार वृत्तसेवा:-
उस्मानाबाद: कोरोना या जीवघेण्या विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. राज्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथील ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव ग्रामस्थांना होऊ नये यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने ८००० मास्कचे मोफत वाटप करण्यात येत आहे. गावातील घरोघरी जाऊन या मास्कचे वाटप करण्यात येत असून लहान मुले, वृद्ध, महिला व ग्रामस्थांना या मास्कचा दररोज वापर करण्याचे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येत आहे. या आवाहनाला ग्रामस्थांनीही चांगला प्रतिसाद दिला असून लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्व जण तोंडाला मास्क लावत आहेत. विशेष म्हणजे जे ग्रामस्थ शेतामध्ये वास्तव्यास गेले आहेत. त्यांनाही शेतामध्ये जाऊन ग्रामपंचायतच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले आहे. घरोघरी जाऊन ग्रामस्थांना मोफत मास्कचे वाटप करणारी सारोळा येथील ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. यापूर्वी सारोळा ग्रामपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गावात टीसीएल व धूर फवारणी करून घेतली आहे. तसेच लवकरच ग्रामस्थांना सॅनिटायझर चेही मोफत वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील इतर ग्रामपंचायतीने ही असा उपक्रम राबवल्यास कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे.