कोरोनाच्या धास्तीने गावाकडे परतणाऱ्या आईसह दोन चिमुकल्यांवर काळाचा घाला
●माकणीजवळ अपघातात चार ठार, दोघे जखमी.
उस्मानाबाद प्रतिनिधी:-प्रशांत नेटके
ठोस प्रहार वृत्तसेवा:-
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पिंपरी-चिंचवडला राहणारी दोन कुटुंबे गावाकडे परतत असताना झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्या मुलींसह आई व चालकाचा समावेश आहे. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास लोहारा तालुक्यातील खेड पाटीजवळ त्यांच्या माकणी गावापासून अवघ्या तीन किलोमीटरवर हा अपघात झाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई परिसरात प्रशासनाने अनेक कामे बंद केली आहेत. या परिस्थितीत या भागात वास्तव्यास असलेले जिल्ह्यातील नागरिक आपापल्या गावाकडे परतत आहेत. लोहारा तालुक्यातील माकणी येथील नारायण साठे व सतीश पवार पुण्यात वास्तव्यास होते. त्यांनी सध्याच्या परिस्थितीत माकणीला परतण्याचा निर्णय घेतला. साठे व पवार आपल्या कुटुंबियांसह एकाच कारने पुण्याहून शुक्रवारी माकणीला निघाले. खेड पाटीजवळ माकणीहून येणाऱ्या कंटेनरची व कारची समोरासमोर धडक झाली. यात चालक नेताजी मनोहर मोरे (२८) यांच्यासह मनीषा नारायण साठे (३२), वैष्णवी नारायण साठे ( १२), वैभवी नारायण साठे (८) हे चौघे जागीच ठार झाले. तर नारायण हरिदास साठे (३६) व त्यांचा मुलगा हरीश नारायण साठे (२) हे गंभीर जखमी झाले आहेत.
*अवघे तीन किमी अंतरावर होते माकणी*
पुण्याहून गावाकडे निघालेले साठे व पवार कुटुंबीय त्यांच्या माकणी गावापासून अवघ्या ३ किलोमीटर दूर असताना कारला अपघात झाला. त्यामुळे पुण्याहून गावाच्या अगदी जवळ सुखरूप प्रवास केलेल्या या कुटुंबीयांवर काळाने अशा प्रकारे घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.