जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरणवरून नागरिक संतप्त
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : शहरात आलेला लसींचा पुरवठा लवकर संपत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी लसींवरुन नागरिक आणि कर्मचारी वर्गांमध्ये वादविवाद होतांना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर संतप्त झालेल्या परिस्थिती पहावयास मिळाले. नागरिकांना सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात लस घेण्यासाठी येण्याचे सांगण्यात आले होते. मात्र सोमवारी लस उपलब्ध नसल्याने काहींना लस मिळाली नसल्याने लसींपासून वंचित राहावे लागले या कारणावरून नागरिकांनी कर्मचा-यांना चांगलेच धारेवर धरले.
लसींचा मोजका साठा येणार असल्याने आपल्याला लस मिळावी यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सर्वच ठिकाणी नागरिकांनी सकाळी ५ वाजेपासून जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर रांगेत उभे होते. यात वयोवृद्ध नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. दरम्यान सकाळी ७ वाजता सर्वच ठिकाणी लसीकरण करणारे कर्मचारी हजर झाले. मात्र लस उपलब्ध नसल्याचे नागरिकांना सांगण्यात आले. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली त्यामुळे नागरिक कर्मचारी वर्गावर चांगलेच भडकले. लस येणार नव्हती आणि लस उपलब्ध नव्हती तर आम्हाला आज का बोलावले असा जाबही नागरिकांनी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारला.