? धक्कादायक! “तारक मेहता” चे लेखक अभिषेक मकवना यांची आत्महत्या..
मुंबई – छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे लेखक अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली. अभिषेक यांनी कर्ज घेतल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केले जात होते. यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका अनेक वर्षांपासून रसिकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका आणि या मालिकेची टीम मोठी आहे. ‘शो मस्ट गो ऑन’ ही उक्ती लक्षात घेऊन एकाला एक पर्याय असावा म्हणून अनेक लेखक या मालिकेसाठी काम करत असतात. त्यातलेच एक लेखक अभिषेक मकवाना.
अभिषेक मकवाना तसे शांतवृत्तीचे होते. पण अचानक त्यांनी मुंबईत आपल्या राहात्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
हा प्रकार 27 नोव्हेंबर रोजी घडला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यांनी आत्महत्या का केली याचे नेमक कारण चिठ्ठीत नमूद केलेले नाही. पण त्यापलीकडे त्यांच्या कुटुंबियांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या जास्त भयंकर आहेत. खरंतर अभिषेक गेल्या काही दिवसांपासून चिंताग्रस्त होते.
एका सायबर घोटाळ्यात ते अडकले होते. सायबरद्वारे त्यांची आर्थिक फसवणूक झाली होती. त्यानंतर ते सतत तणावात होते. शिवाय त्यांना याबद्दल अनेकदा फोनही येत होते. पण त्याबद्दल त्यांनी कधी थेट वाच्यता केली नव्हती. अभिषेक यांनी अचानक असे पाऊल उचलल्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त होत आहे.