शेतकरी संघटनेने केले तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी ई-मेल आंदोलन
लातूर प्रतिनिधी: – प्रशांत नेटक
जनुकीय सुधारित बियाण्याला परवानगी द्यावी या मागणीसाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने २८ मे रोजी केंद्र व राज्य सरकारमधील संबंधित मंत्र्यांना ई-मेल पाठविण्याचे आंदोलन केले असल्याची माहीती शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी माध्यमांना दिली आहे.
जगभरामध्ये जनुक सुधारीत (जेनिटिकली मॉडिफाईड) बियाणे वापरले जाते व त्या आधारे कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन अनेक देशात घेतले जात आहे. भारतात मात्र फक्त कापसाच्या बी.जी २ या जी.एम वाणा नंतर कोणत्याही वाणास किंवा पिकाच्या जी.एम बियाण्याला परवानगी देण्यात आलेली नाही.

कपाशीमध्ये तननाशक रोधक बियाणे उपलब्ध आहे व जगभरातील शेतकरी त्याची पेरणी करतात. तननाशक रोधक असल्यामुळे तननाशकाच्या एका फवारणीने तनांचा बंदोबस्त होतो व खुरपणीचा हजारो रुपयाचा खर्च वाचतो. उत्पादनही चांगले येते. भारतात मात्र हे बियाणे वापरण्यास बंदी आहे. आपल्या देशात जिएम पिके घेण्यास बंदी आहे ,मात्र जी.एम सोयाबिन पासुन तयार केलेले तेल सरकार अधिकृतपणे आयात करते.या विरोधात मागील वर्षी शेतकरी संघटनेने अकोली जहागीर येथे तननाशक रोधक कापुस बियाण्याची जाहीर लागवड करत किसान सत्याग्रह करुन सविनय कायदे भंग केला होता.व सरकारला जी.एम पिकांना परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. या वर्षी सुद्धा सरकारचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यासाठी, २८ मे, स्व. अजित नरदे यांच्या जयंतीच्या दिवशी हजारो शेतकऱ्यांनी पंतप्रधान , केंद्रीय कृषि मंत्री, केंद्रीय पर्यावरण मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कृषिमंत्री, पर्यावरण मंत्री व गृह मंत्र्यां यांना ई-मेल पाठवून, ई-मेलद्वारे जी.एम पिकांना परवानगी देण्याची मागणी केली आहे. जर आठ दिवसात सरकारने जी.एम बियाण्यांना परवानगी दिली नाही तर त्या नंतर “मै भी गुनेहगार” आंदोलन देशभर सुरु करण्यात येइल. या आंदोलनात शेतकरी जाहीरपणे जी.एम कापुस, सोयाबीन , मका, वांगी, मोहरी या पिकांच्या लागवडी करतील व प्रशासनाला कळवतील. शेतकरी आपल्या शेतात ” मी जी.एम शेतकरी, मै भी गुनेहगार ” असे फलक लावत शेतकरी हा गुन्हा करणार आहेत.
जी.एम पिकांचे बिजोत्पादन, पॅकिंग व विक्री गुजरात , आंध्र प्रदेश व तेलंगणात प्रामुख्याने जास्त होते. तेथे शेतकर्यांवर पोलीस कारवाई होत नाही मात्र महाराष्ट्रात धाडी टाकल्या जातात व शेतकर्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. सरकारच्या या धोरणाच्या विरोधात शेतकरी संघटनेचे *, ‘मै भी गुनेहगार’ हे देशव्यापी आंदोलन असेल* या आंदोलनात अनेक राज्यातील शेतकरी जाहीरपणे विविध जी.एम पिकांची जाहीर लागवड करतील अशी शेतकरी संघटनेच्या पुढील आंदोलनाची दिशा राहणार आहे.
या ई-मेल आंदोलनात शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव,आण्णाराव चव्हाण,राम मसलगे, विठ्ठल सोमवंशी,अजहर पठाण, शिवाजी पाटील, बाबुराव चामले,आदिंसह कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. अशी माहिती युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी माध्यमांना प्रसिद्धीस दिली.






