Nashik

नाशिक येथीलऐतिहासिक सांस्कृतिक,सामाजिक,धार्मिक,राजकिय आणि क्रिडांगणाच्या उपयोगासाठी उपयुक्त ईदगाह मैदानाच्या जागेवर स्मार्टसिटी कंपनी आणि मनपा प्रशासनाने बस टर्मिनल उभारण्याच्या प्रकल्पाला त्वरित रद्द करा

नाशिक येथीलऐतिहासिक सांस्कृतिक,सामाजिक,धार्मिक,राजकिय आणि क्रिडांगणाच्या उपयोगासाठी उपयुक्त ईदगाह मैदानाच्या जागेवर स्मार्टसिटी कंपनी आणि मनपा प्रशासनाने बस टर्मिनल उभारण्याच्या प्रकल्पाला त्वरित रद्द करा

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : आम्ही नाशिकमधील विविध सामाजिक संघटनांचा एक समूह म्हणून संविधान प्रेमी नाशिककरच्या वतीने आपणांस तातडीने हे कळवू इच्छितो की, नाशिक शहराला स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट करण्याच्या प्रयत्नात या शहराच्या नागरिकांच्या “श्वास” घेण्याच्या मोकळ्या जागा खाजगी कंपन्यांच्या घश्यात घालण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न मनपा प्रशासन करीत आहे.जी अत्यंत निंदनीय व खेदजनक बाब आहे.याचा आम्ही प्रथमतः निषेध करीत आहोत.

ईदगाह मैदान हे नाशिक शहरातील प्राचिन ऐतिहासिक जागा असून महसूल विभागाच्या अंतर्गत ही जागा येत असल्याने नाशिक जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नाशिक महानगरपालिका प्रशासनास ही जागा देखरेखीसाठी दिलेली आहे.मात्र स्मार्ट सिटी कंपनीच्या एकंदरीत कारभारावर मोठ्या प्रमाणात संशयास्पद टिका टिप्पणी होत असतांनाच नाशिक शहर बस व्यवस्थापन प्रचंड तोट्यात असलेल्या योजनेकरीता ईदगाह मैदानाचे अस्तित्व संपुष्टात आणून नाशिक शहराचा विकासाच्या नावाखाली “विनाश” करण्याचा जो फाजील प्रयत्न केला जात आहे,यांची त्वरीत चौकशी आपल्या मंत्रालयामार्फत करण्यात यावी,अशी आग्रहाची मागणी करतानाच खालिल प्रमाणे काही महत्त्वपूर्ण बाबींकडे आपले लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.

१) ईदगाह मैदान हे पूर्वीच्या मूळ नाशिक शहरातील अत्यंत मध्यवर्तिय ठिकाण आहे,मूळ नाशिक शहरात राहणाऱ्या नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठीच्या जागा जवळपास संपुष्टात आल्या आहेत,व अत्यंत कमी उरलेल्या जागांपैकी एकमेव असे हे ईदगाह मैदान आहे, त्यामुळे विकासाच्या नावाखाली नाशिक शहरवासियांचा “श्र्वास घोटण्याचा” प्रयत्न स्मार्टसिटी कंपनीने करु नये.

२) ईदगाह मैदानासमोरच नाशिक जिल्हा “सिव्हिल हॉस्पिटल” आहे.त्यामुळे हा परिसर सायलेंट झोन मध्ये अंतर्भूत केला आहे.या परिसरात सध्या ठक्कर बाजार हे खाजगी बसस्थानक आहे.त्यामुळे येथील परिसरात वाहनांची प्रचंड प्रमाणात वर्दळ असल्याने पुन्हा अजून एक बस टर्मिनल उभारून येथील सायलेंट झोन,वाहतूकीस अडथळा निर्माण करून आपण सर्वसामान्य नाशिककरांच्या रूग्णांना इस्पितळात जाण्याअगोदरच यमसदनी पाठविणारा की काय..? असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककर करीत आहे,हे नाशिककरांच्या जीवीताशी खेळण्याचा प्रयत्न आहे.

३) स्मार्टसिटी कंपनीने शहराचा ताबा घेतल्यापासून मा.जिल्ह्याधिकारी नाशिक यांच्या कार्यालयासमोर ज्या सामाजिक व राजकीय संस्था,संघटना,पक्ष आंदोलन करीत होत्या,त्यांना बंदी घालण्यात आली असून ईदगाह मैदान समोरील जागा मा.जिल्ह्याधिकारी यांनी राखीव ठेवली आहे,आता हीच जागा स्मार्टसिटी कंपनीच्या घशात घालून लोकशाही व्यवस्थेत शासन-प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात होणाऱ्या आंदोलनांना चिरडून टाकून भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करण्याचा प्रयत्न स्मार्टसिटी कंपनी मनपा प्रशासनाच्या माध्यमातून करीत आहे.

४) ईदगाह मैदानावर नाशिक शहरातील अनेक युवकांचे स्पोर्ट्स क्लब खेळण्यासाठी येत असतात.सर्वसामान्य नाशिककरांच्या कुटुंबातील युवकांसाठी ही शेकडो वर्षांपासून हक्कांचे असलेले मैदान आहे,खाजगी स्पोर्ट्स क्लब मध्ये हजारों रूपये खर्च करून खेळण्यासाठी ज्यांची ऐपत नाही,ते युवा नाशिककर हक्काने या मैदानावर खेळायला येतात.स्मार्टसाटीच्या नावाखाली हळूहळू ही खेळायची जागा गिळंकृत करण्याचा अप्रत्यक्षरीत्या प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहे.असे आम्हास जाणवते.

५) ईदगाह मैदानावर नाशिक शहरातील मुस्लिम बांधव वर्षातून दोन वेळा लाखोंच्या संख्येने ईदची नमाज अदा करण्यासाठी एकत्रितरित्या येत असतात, यावेळी नाशिकमधील इतरधर्मिय बांधव ईदची शुभेच्छा देण्यासाठी व सामाजिक, धार्मिक सलोखा निर्माण होण्यासाठी मुस्लिम बांधवांना भेटतात, ही सामाजिक आणि धार्मिक सलोखा निर्माण करण्यासाठीची ऐतिहासिक महत्त्वपूर्ण जागा आहे.त्या जागेचे मुख्य प्रवेशद्वार संपुष्टात आणून नाशिक शहरातील बंधुभाव आणि एकात्मतेला बांधा पोहोचविण्याचा हा अप्रत्यक्षरीत्या प्रयत्न आहे कि काय..? असा दाट संशय निर्माण होत आहे.

६) ईदगाह मैदानावर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय सभांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असतात,या कार्यक्रमात लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होत असतात, यावेळी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाची फार मोठी जबाबदारी असते, त्यामुळे या ईदगाह मैदानास आंत आणि बाहेर पडण्यास दोन प्रवेशव्दार आहेत, त्यामुळे पोलिस प्रशासनास बंदोबस्त करतांना या व्यवस्थेचा उपयोग गर्दीला नियंत्रित ठेवण्यासाठी होत असतो,स्मार्टसिटी कंपनीच्या या तोट्यातील बस टर्मिनल करीता ईदगाह चे मुख्य प्रवेशद्वार संपुष्टात येऊन शासकिय विश्राम गृहामागिल एकच रस्ता अस्तित्वात राहील,व भविष्यात एखाद्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाल्यास हजारों लोकांच्या जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

७) सदरहू शहर बस वाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस या कालबाह्य होत असून पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे, त्यामुळे वायु प्रदुर्षण आणि ध्वनी प्रदूर्षणाने नाशिक शहर अगोदरच ग्रस्त असतांनाच त्यामध्ये अधिक भर टाकण्याचा घाट घातलेल्या स्मार्टसिटीच्या एकंदरीत सर्व कारभाराची त्वरीत उच्चस्तरीय चौकशी व्हावी.

८) शहर बससेवा महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या मार्फत आतापर्यंत चालविला जात होता,जो अनेक वर्षांपासून तोट्यात आहे,असे असतांना नाशिक शहरातील नागरिकांचा पैसा तोट्याच्या योजनेमध्ये लावून कोणाकोणाला आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून मनपा प्रशासन करीत आहे,यांची उच्चस्तरीय चौकशी करून या तोट्याच्या योजनेमध्ये नाशिककरांच्या पैश्यांची उधळपट्टी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी,अशी आमची मागणी आहे.

वरील अतिशय महत्त्वपूर्ण बाबी आम्ही आपल्या लक्षात आणून दिल्या आहेत,बस टर्मिनल शहराच्या लगत असलेल्या अनेक मोकळ्या भूखंडावर उभारण्यात येऊ शकतो, त्यामुळे भविष्यात शहरातील विविध स्तरांवरील दुष्परिणाम लक्षात घेऊन हा प्रकल्प ईदगाह मैदानालगत होऊ नये,असे केल्यास समस्त नाशिककर संविधानिक मार्गाने याचा विरोध करेल.तरी आपण संबंधित विषयाचे महत्त्व आणि त्यामागील संवेदनशीलता लक्षात घेऊन हा प्रकल्प त्वरीत इतरत्र स्थलांतरित करावा ही नम्र विनंती… असे निवेदनात म्हटले आहे

यावेळी उपस्थित(किरण मोहिते) (काॅ.राजू देसले) (पद्माकर इंगळे) (महादेव खुडे) (आसिफ शेख) (संतोष जाधव) (नितीन मते) (अॅड.नझिर काझी) (अॅड.प्रभाकर वायचळे) (स्वप्निल घिया) (समाधान बागुल) (रामदास भोंग) होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button