राज्यातील ठाकरे सरकारने शेतकरी कर्जमाफी ची दुसरी यादी केली जाहीर
मुंबई पी व्ही आंनद
महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज दोन लाख रुपयांपर्यंतचे आहे अश्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची घोषणा नागपूरमध्ये पहिल्या अधिवेशनात केली होती.या घोषणेनुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ६८ गावांतील १५३५८ शेतकऱ्यांचा समावेश होता. प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा यामध्ये समावेश होता. योजनेअंतर्गत सुमारे ३६ लाख ४५ शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी अपेक्षा राज्य सरकारला आहे. त्यापैकी ३४ लाख ९८ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती राज्य शासनाच्या पोर्टलवर अपलोड झाली आहे.
आता सरकारने २१ लाख ८२ हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामुळे साधारणतः शेतकऱ्यांना सुमारे चौदा हजार कोटींची कर्जे माफ होतील असा अंदाज आहे. त्यासाठीची आर्थिक तरतूद राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात करुन ठेवली आहे. राज्य शासनाने आतापर्यंत सुमारे २५ हजार कोटी रुपये शेतकरी कर्जमाफीसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
या कर्जमाफीमध्ये आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जाच्या बॅंक खात्यात जमा केली जाईल. आतापर्यंत ७२९४७ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर व्यापारी बॅंका २४ तासांमध्ये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका ७२ तासांमध्ये संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमाफीचे लाभ देणार आहेत.
दुसऱ्या यादीत राज्यातील २८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. १५ जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर १३ जिल्ह्यातील अंशत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तूर्तास कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यांचा या दुसऱ्या यादीत समावेश नाही. त्यांना २९ मार्चनंतर निवडणुका संपल्यानंतर योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.