आमदार शिरीष चौधरी यांचे तहसीलदार यांना निवेदन
सलीम पिंजारी फैजपूर
रावेर-यावल परिसरात अतिवृष्टीमुळे ज्वारी, मका, सोयाबीन या पिकांच्या दाण्यांना झाडावरच कोंब फुटले आहेत. तर ज्वारी पूर्णपणे काळी झाली आहे. तसेच वेचणीवर आलेला कापूस भिजून खराब झाला आहे. त्यामुळे शेतक-यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. अशा नुकसानीचे त्वरीत पंचनामे करावे अशा सूचना रावेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री शिरीष मधुकरराव चौधरी यांनी आज दि. २७ ऑक्टोबर २०१९ रोजी रावेर व यावलच्या तहसिलदारांना दिले आहेत.
तसेच झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन ज्या शेतक-यांनी पीक विमा घेतलेला आहे, त्यांना विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासंबंधी त्वरीत योग्य ती पावले उचलण्यासंबंधी त्यांनी मा. जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा केली. सरकारने याबाबत त्वरीत लक्ष घालून ज्या शेतक-यांनी विमा काढलेला आहे त्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याच्या व नवीन केळी लागवडीचा विमा काढून घेण्याचे आदेश संबंधितांना द्यावे अशी मागणी आ. चौधरी यांनी केली आहे. गेले तीन महिने या विभागात सतत पाऊस पडत असल्याने उडीद, मूग, चवळी ही पीके तर हातची गेलीच आहेत पण पावसाळा लांबल्याने कापणीवर आलेली ज्वारी व मका खराब झाला आहे पण निवडणूकीची प्रकिया चालू असल्याने त्या संदर्भात कोणतीही कार्यवाहीझालेली नव्हती. आमदार शिरीष चौधरी यांना मतमोजणी नंतर त्वरीत मुंबईला जावे लागले
होते.
आज मुंबईहून परत येताच त्यांनीही पावले उचलली. ते या प्रकरणाचा पाठपुरावा करीत असून शेतक-यांना दिलास देण्याचा प्रयत्न करीत आहेत.