कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांच्या एकजुटीने जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज : पालकमंत्री गुलाबराव पाटील
रजनीकांत पाटील
‘ऑक्सीजनयुक्त’ बेडच्या वाढीव वॉर्डाचे लोकार्पण
जळगाव ::> जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन, प्रशासन, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अत्याधुनिक सोयीसुविधा तयार होत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपल्याला लवकरच यश मिळेल. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी केले.
पालकमंत्री ना. पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यात पूर्वी कोरोनाचे स्वॅब तपासणीसाठी लॅब नव्हती. राज्य शासनाकडे याचा मी सतत पाठपुरावा केल्याने टेस्टीग लॅब जिल्ह्याला मिळाली. अन्यथा पूर्वी चार ते आठ दिवसानंतर येणारे अहवालाच्या तक्रारी, रुग्णांच्या तक्रारी, आरोग्य सुविधांची वानवा असे अनेक प्रश्न होते. ते प्रश्न या लॅबमुळे निकाली निघाले.
आता जिल्ह्यात आपली स्वतःची टेस्टींग लॅब आहे, जिल्ह्यात आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड, व्हेटींलेटर याची उपलब्धता आहे. यामुळे कोरोना बाधीतांवर त्वरीत अत्याधूनिक प्रकारचे उपचार होत आहे. आता कोरोना बाधीतांचा मृत्यूदरही खाली आला आहे.
यामुळे जिल्हा सुविधांबाबत राज्यातील प्रमुख शहरांतील रुग्णालयाचाही पुढे गेला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. त्यास जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे.
पालकमंत्री म्हणाले की, आगामी काळासाठी आमची आरोग्य यंत्रणा सज्ज असली तरी पुढील काळातील दुर्गात्सवासह येणारे सण, उत्सव भाविकांनी, नागरिकांनी सोशल डिस्टनींगचे पालन करीत साधेपणाने साजरे करावेत. सर्वांनी कोरोनाबाबत काळजी घेताना तोंडाला मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले.