? जळगांव Live..अभिमानास्पद…जळगांव चे जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित…!
जळगाव निसर्गाचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियान २०२०-२१ अतंर्गत जळगाव जिल्ह्याने राज्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचा सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज ऑनलाईन सन्मान करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बन्सोड, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान झाला.
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय विभागातर्फे माझी वसुंधरा अभियानातंर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची २ ऑक्टोबर, २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत पाच गटात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ आज पर्यावरण दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाईन झाला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे, बी. ए. बोटे उपस्थित होते.






