Mumbai: 3 तासात करू खात्मा…रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी..8 फोन कॉल..
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या चिंता वाढवत आहे. रिलायन्स उद्योग समुहामुलं जगभरातील श्रीमंतांच्या यादीत विराजमान होणाऱ्या अंबानी कुटुंबाला धोका असल्याची बाब समोर आली आहे. अंबानी कुटुंबाला पुढील तीन तासांत संपवण्याची धमकी देणारे काही फोन आल्यामुळं एकच खळबळ माजली आहे.
प्राथमिक माहितीनुसार रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या लँडलाईनवर हे फोन आले. सात ते आठ फोन आले ज्या माध्यमातून धमकी देण्यात आली. मुंबई पोलिसांनी तातडीने प्रकरण हाती घेत तपास सुरु केला आहे. तेव्हा आता क्रमांकाची पडताळणी होताच कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष असेल.
दरम्यान, अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारमुळंही यापूर्वी बराच तणाव निर्माण केला होता. अद्यापही या प्रकरणाच्या घडामोडी सुरु असतानाच पुन्हा एकदा अंबानी कुटुंबाला धमकावणारे फोन आल्यामुळं प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
आठ वेळेस धमकी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानी यांना धमकी देणारे आठ फोन कॉल्स आले होते. या फोन कॉलची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे आठही फोन कॉल्स आजच आले. येत्या तीन तासात अंबानी कुटुंबीयांचा खात्मा करणार असल्याची धमकी या दरम्यान देण्यात आली. पोलिसांचे एक पथक रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहे. या प्रकरणात कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला जात असून अधिक माहिती घेतली जात आहे.
रिलायन्स फाउंडेशन संचलित रुग्णालयाचे सीईओ डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांनी ‘एबीपी’ सोबत बोलताना सांगितले की, आम्हाला आठ फोन कॉल आले होते. आम्ही या धमकी देणाऱ्या फोन कॉलला गांभीर्याने घेतले असून फोन करणारे दहशतवादी असू शकतात असे त्यांनी म्हटले. फोन कॉलची माहिती पोलिसांना तात्काळ दिली. रिलायन्सच्या सुरक्षा रक्षकांनाही याची माहिती देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.






