Amalner: तालुक्यातील शेतकर्यांवर पुन्हा अस्मानी संकट..वादळामुळे रब्बी पिके झाली भुईसपाट.. शेतकरी हवालदिल..! सर्व अधिकारी नॉट रीचेबल..!
अमळनेर तालुक्याला शनिवारी रात्री पहाटे पासून अचानक वादळी वार्याने झोडपले. पहाटे-पहाटे रब्बीच्या पिकांवर संकट कोसळले. यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. वार्याचा वेग जोरदार असल्याने काही भागात फुलोर्यावर आलेल्या रब्बी मका, ज्वारी, ऊस, दादरचे मोठे नुकसान झाले. तसेच रब्बी दादर ज्वारीसह मका, गहू आदी रब्बीचे पिके जमीनदोस्त झाली. एकतर खरीप हातातून गेला होता तर रब्बीने आशा जागवल्या होत्या. मात्र, वादळी वार्याने शेतकर्यांच्या रब्बी हंगामाच्या आशेवर पाणी फीरले आहे.
रब्बीची पिके फुलोर्यावर आली होती. परंतु अचानक आलेल्या वादळाने बहरलेल्या पिकांना जमीनदोस्त करून टाकले. तालुक्यात खरिपाच्या हंगामातही अवकाळी पावसाने देखील रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले होते. त्यामुळे खरीपात पिकांचे उत्पन्न हातात न आल्याने कुटुंबाला खाण्यासाठी व्हावी, यासाठी रब्बीचा तालुक्यात पुन्हा पेरा झाला होता. अचानक आलेल्या वादळाने मात्र रब्बीच्या पिकांनाही जमीन दाखविल्याने तालुक्यात दोन्ही हंगामात उत्पन्न न आल्याने मात्र शेतकरी हवालदिल झाला आहे.
या वादळी हवेने मका, ज्वारी, गहू आणि फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले असून, अनेक भागात रब्बीच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. शहरासह तालुक्यात मांडळ, मारवड, कळमसरे, अमळगाव भागात महसुली मंडळांत वादळी वार्याचा जोर रात्रभर कायम राहिल्याने रब्बीच्या पेरण्या झालेल्या पिकांपैकी तब्बल चार मंडळातील गहू, मका, ज्वारी, दादर पिकांना या वादळाचा फटका बसला आहे. तालुक्यात शनिवारी रात्री अचानक वार्यांच्या वेगाने हे नुकसान झाले आहे. दरम्यान शासनाचा एकही अधिकारी ना तहसीलदार ना मंडळ अधिकारी ना कृषी विभाग कोणीही शेतकऱ्यांची ही समस्या जाणून घेतली नाही. अमळनेर तालुक्यात ह्या वादळामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मात्र दिवसभरात तालुका कृषी विभागाचा एकही अधिकारी पंचनामे किंवा चौकशी साठी आला नाही. अशी चर्चा गावांमध्ये सुरू आहे.त्याच प्रमाणे लोक प्रतिनिधी देखील गायब असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून अनेक शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनी वरून ही माहिती दिली आहे.कोणाचाही धाक दरारा अधिकाऱ्यांना राहिला नाही. राजकीय नेत्यांच्या दबाव किंवा आदर युक्त दरारा राहिला नसल्यामुळे बेजबाबदार पणा वाढला असल्याची खरमरीत प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने नाव न सांगण्याच्या बोली वर दिली आहे.तसेच सामान्य शेतकऱ्यांचा कोणीही वाली नसल्याचे देखील मत व्यक्त एका शेतकऱ्याने केले आहे.